Meghna Bordikar 
मराठवाडा

Parbhani Politics: 'खान पाहिजे की बाण' नरेटिव्ह बदललं! भाजपला मुस्लिम मतदारांची पसंती? कमळाच्या चिन्हावर निवडून आले १२ नगरसेवक

Parbhani Politics News : परभणी जिल्ह्यात आतापर्यंत खान पाहिजे की बाण? अशा चुकीच्या पद्धतीने प्रचार केला गेला, असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.

Jagdish Pansare

Parbhani Politics News : परभणी जिल्ह्यात आतापर्यंत खान पाहिजे की बाण? अशा चुकीच्या पद्धतीने प्रचार केला गेला. पण आता हे मतदारांना मान्य नाही. मुस्लिम समाज भाजपला मतदान करत नाही, हा समाज हिंदुत्ववादी पक्षासोबत कधीच नसतो हा समज परभणीतील मतदारांनी चुकीचा ठरवला आहे. भाजपच्या कमळ चिन्हावर बारा मुस्लिम नगरसेवक निवडून आले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपची हीच रणनिती असणार आहे, असे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केले.

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सगळेच राजकीय पक्ष जय-पराजयावर मंथन करत आहेत. परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची प्रतिष्ठा या निमित्ताने पणाला लागली होती. त्यांच्या नेतृत्वात पक्षाची कामगिरी कशी होते? याकडे राज्यातील भाजप नेत्यांचेही लक्ष होते. महायुतीला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यश मिळाले. स्वबळावर लढलेल्या भाजपचा स्ट्राईक रेटही चांगला राहिला. विशेष म्हणजे, भाजपला मुस्लिम द्वेषी ठरवणाऱ्यांनाही या निवडणुकीत चपराक देण्यात पक्ष यशस्वी ठरला आहे.

भाजपच्या कमळ चिन्हावर परभणी जिल्ह्यात बारा नगरसेवक निवडून आले आहेत. हा आकडा सांगत मेघना बोर्डीकर यांनी आगामी महापालिका निवडणुकीत भाजपची हीच रणनिती असेल हे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सबका साथ सबका विकास' ही बारा मुस्लिम नगरसेवक कमळ चिन्हावर निवडून आले याचीच पावती असल्याचा दावाही बोर्डीकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना केला.

जिल्ह्यातील विविध नगरपालिकांमध्ये मिळालेल्या यशाबाबत मेघना बोर्डीकर यांनी समाधान व्यक्त केले. भाजप सरकारने 'सबका साथ, सबका विकास' या भूमिकेतून सर्व समाजघटकांना विकासाच्या योजनांचा लाभ दिला आहे. या धोरणाची जाणीव आता मुस्लिम समाजालाही होत असून, त्यातूनच जिंतूर, सेलू आणि सोनपेठ नगरपालिकांमध्ये भाजपच्या चिन्हावर 12 मुस्लिम नगरसेवक निवडून आले आहेत. हीच रणनीती येणाऱ्या परभणी महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राबविण्यात येणार असल्याचे बोर्डीकर यांनी स्पष्ट केले.

'खान हवा की बाण हवा' अशा प्रकारचा चुकीचा प्रचार आता जनतेला मान्य नाही. विकास हाच केंद्रबिंदू असून, आगामी निवडणुकांमध्ये भाजपला निश्चित यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सोनपेठ नगरपालिकेत आमदार राजेश विटेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत युतीबाबत कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे भाजपला जनसुराज्य पक्षाचा पॅनल उभा करावा लागला. या माध्यमातून गेल्या 25 वर्षांची सत्ता उलथवून टाकण्यात भाजपला यश मिळाले, असे त्यांनी नमूद केले. तसेच गंगाखेड आणि मानवत नगरपालिकांमध्ये काही चुका झाल्याचे मान्य करत, त्या चुका भविष्यात निश्चितपणे सुधारल्या जातील, असे त्या म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT