Khaire-Thackeray-Danve Political News Sarkarnama
मराठवाडा

Shivsena UBT News : उद्धव ठाकरे यांनी प्रवक्ते पदाच्या यादीतून अंबादास दानवे यांना वगळले!

Uddhav Thackeray removes Ambadas Danve from the list of Shiv Sena spokespersons. : आगामी मुंबई महानगरपालिका तसेच राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाहता उद्धव ठाकरे यांनी हे बदल केले आहेत.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपली ध्येयधोरणे आणि देश व राज्य पातळीवर भूमिका मांडण्यासाठी मुख्य प्रवक्ते आणि प्रदेश प्रवक्त्यांची नावे आज जाहीर केली. शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना मात्र यातून वगळण्यात आले आहे. विधान परिषदेवर निवडून गेल्यानंतर वर्षभरातच अंबादास दानवे यांच्यावर एप्रिल 2021 पासून राज्य प्रवक्ते म्हणून जबाबदारी होती.

नव्या नियुक्त्यांमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महिलांना अधिक प्राधान्य दिल्याचे या यादीवर नजर टाकल्यास दिसते. प्रियंका चतुर्वेदी, किशोर पेडणेकर, सुषमा अंधारे, संजना घाडी आणि जयश्री शेळके या उद्धव सेनेच्या पाच रणरागिणी यापुढे पक्षाची भूमिका रोखठोकपणे मांडणार आहेत. याशिवाय आनंद दुबे, हर्षल प्रधान आणि अनिल परब यांची त्यांना भक्कम साथ असणार आहे. मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी शिवसेना नेते राज्यसभेचे खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

आगामी मुंबई महानगरपालिका तसेच राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाहता उद्धव ठाकरे यांनी हे बदल केले आहेत. शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राज्य प्रवक्ते म्हणून मागील पाच वर्षापासून पक्षाची ध्येयधोरणे आणि भूमिका ठामपणे राज्य पातळीवर मांडण्याचे काम केले. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी आपली छाप पाडली आहे. उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक अशी ओळख त्यांनी काही वर्षात निर्माण केली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पातळीवर विचार केला तर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि दानवे यांच्यातील कुरबुरी लोकसभा आणि त्यानंतर झालेले विधानसभा निवडणुकीतील पक्षाला आलेल्या पराभवानंतरही थांबलेल्या नाहीत. खैरे- दानवे अंतर्गत वादाचा फटका तर अंबादास दानवे यांना बसला नाही ना? अशी चर्चा या निमित्ताने होताना दिसते आहे. अंबादास दानवे हे गेल्या दोन दशकापासून संभाजीनगरचे जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. याशिवाय विधान परिषदेत आमदार आणि विरोधी पक्षनेते म्हणून ते कार्यरत आहेत.

तर राज्य प्रवक्ते म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. गेल्या वर्षी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांना पक्षात प्रमोशन देत त्यांची नेते पदावर निवड केली. या सगळ्या घडामोडी आणि जबाबदाऱ्या दिल्यानंतरही लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला जिल्ह्यात चमकदार कामगिरी करता आली नाही. विधानसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पाटी जिल्ह्यात कोरी राहिली. तर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

खैरे-दानवे वादाची किनार?

या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या प्रवक्त्यांच्या यादीमध्ये अंबादास दानवे यांचे नाव नसणे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारे ठरले आहे. गेल्या आठवड्यात संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढलेले राजू शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात राजू शिंदे यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याबद्दलची नाराजी व्यक्त केली होती. तर अंबादास दानवे यांचे आभार मानले होते.

शिंदे यांच्या पक्ष सोडून गेल्यानंतर दोन दिवस खैरे विरुद्ध राजू शिंदे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू होते. तर उद्धव ठाकरे यांच्यासमोर माझे आणि अंबादास दानवे यांचे वाद मिटल्याचे जाहीर झाल्यानंतरही अंबादास दानवे यांनी सातत्याने मला डावलले. मला न विचारता परस्पर निर्णय घेतले, विधानसभा निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चुकीची माहिती देऊन चुकीच्या उमेदवारांना विधानसभेत तिकिटे दिली. परिणामी पक्षाची नाचक्की झाली, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी नुकताच केला होता. याशिवाय अंबादास दानवे ऑगस्टपर्यंतच विरोधी पक्षनेते आहेत, असा टोला खैरे यांनी लगावला होता.

वारंवार मातोश्रीवर बोलवून खैरे- दानवे यांच्यात समेट घडवून आणण्याचे प्रयत्न करूनही त्यात यश न आल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता छत्रपती संभाजीनगर मध्ये भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतला की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यात पक्षाला लागलेली गळती रोखण्यात देखील शिवसेनेचे दोन्ही नेते अपयशी ठरले. एकूणच काय? तर खैरे- दानवे यांच्या वादात पक्ष जिल्ह्यात अधिक कुमकुवत होत असल्याच्या तक्रारी थेट मातोश्रीपर्यंत पोहोचल्या. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दिशेने उद्धव ठाकरे यांनी पहिले पाऊल टाकले की काय? असे प्रवक्ते पदावरून दानवे यांना हटवल्यानंतर बोलले जात आहे.

५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT