Ashok Chavan Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan in BJP : अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाने नांदेडमधूनच 'काँग्रेसमुक्ती'ला सुरवात ?

Laxmikant Mule

Nanded News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपचे कमळ हाती घेतले. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते या घटनेला मोठा धक्का मानायला तयार नसले तरी त्यांच्यासाठी तो धक्काच होता, हे राज्यसभेच्या निवडणुकीतूनच दिसून येणार आहे. भाजपने 2014 मध्ये लोकसभा निवडणूक प्रचाराच्यावेळी काँग्रेसमुक्त भारत हा नारा दिला होता. गेल्या दहा वर्षात भाजपचे हे स्वप्न काही प्रमाणात यशस्वी होताना दिसत आहे.

दोनवेळा राज्याचे मुख्यमंत्री, खासदार राहिलेल्या अशोक चव्हाण यांनी आपला काँग्रेस सोबतचा चार दशकांचा प्रवास एका झटक्यात संपवला. भाजपमधील त्यांच्या प्रवास आणि त्यांच्यासोबत नांदेड, मराठवाड्याच्या काही भागातील काँग्रेसचे आमदार, पदाधिकाऱ्यांची कमळ हाती धरण्याची तयारी पाहता इथूनच काँग्रेसमुक्तीला सुरवात झाली असे म्हणावे लागेल.

अशोक चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या नांदेड जिल्ह्यात तरी सध्या अशीच काहीसी परिस्थिती आहे. जिल्ह्यातील स्वतः चव्हाण यांच्यासह चार पैकी तिघे भाजपच्या गळाला लागले आहेत. काँग्रेसकडे जिल्ह्यातील हदगांवचे एकमेव आमदार माधवराव पवार आहेत. भविष्यात ते काय निर्णय घेतील हे सांगणेही कठीण आहे. चव्हाण यांचे भाऊजी माजी मंत्री भास्करराव पाटील यांनीही मेहुणे अशोक चव्हाण यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे म्हणत त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.

जिल्ह्यातील काँग्रेसचे हे प्रमुख नेतेच बाहेर पडल्यामुळे खऱ्या अर्थाने आता नांदेड जिल्हा 'काँग्रेसमुक्ती'च्या वाटेवर आहे. काँग्रेसचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेडची तटबंदी आता गळून पडली आहे. चव्हाण यांच्या भाजपात जाण्याने या गडाला मोठे भगदाड पडले आहे. किल्लेदारच किल्ला सोडून गेल्याने सैन्य सैरभैर व्हावी, अशीच काहीशी परिस्थिती जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कंट्रोल न होणारे डॅमेज..

चव्हाण यांच्या पक्ष सोडण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी काँग्रेसने राज्य पातळीवर डॅमेज कंट्रोल सुरू केले आहे. पण नांदेड मधील पदाधिकारी व कार्यकर्ते या अनपेक्षित धक्क्यातून अद्याप सावरू शकलेले नाहीत. ‌‌‌‌‌‌गेल्या दीड वर्षांपासून अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात जाणार अशी चर्चा होती.

या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. त्यांच्या सोबत माजी आमदार अमरनाथ राजूरकर अन्य काही आजी-माजी पदाधिकारी भाजपात गेले आहेत. तर काही जाण्याच्या वाटेवर आहेत. जिल्ह्याच्या राजकारणावर पाच दशके अधिराज्य गाजवणाऱ्या अन् काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या चव्हाण कुटुंबाचा पक्ष सोडण्याचा निर्णय अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. पण ज्यांच्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसचे वैभव होते तेच निघून गेल्यामुळे त्यांच्या समर्थकांनाही पर्याय राहिलेला नाही.

येणाऱ्या काळात काँग्रेसला उभारी देणारा दुसरा नेताच जिल्ह्यात नसल्याने काँग्रेसची कोंडी झाली आहे. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर व अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा जिल्ह्यात विस्तार झाला. तसेच या दोन नेत्यांकडे काही काळाचा अपवाद वगळता कायम सत्ता राहिली आहे.

नांदेड जिल्ह्यातील पदाधिकारी नियुक्ती, स्थानिक स्वराज्य संस्था, आमदार, बाजार समिती, संघटनात्मक पद, सत्तेचा लाभ अशोक चव्हाण व खतगावकर यांच्या माध्यमातून मिळालेले सर्व लाभार्थी हे या निर्णयानंतरही त्यांच्यासोबत आहेत. पक्षातून‌ एखादा नेता फुटून गेला की त्याचे पडसाद लगेच उमटते. पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन, निषेध करतात.

पण अशोक चव्हाण थेट विरोकांच्या तंबूत जाऊन बसले तरी शहर व जिल्ह्यात शांतता आहे. त्यामुळे पक्षापेक्षा नेताच श्रेष्ठ हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. नांदेड जिल्ह्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक आहे. अशोक चव्हाण यांच्यासह जिल्ह्यात चार आमदार गेल्या निवडणुकीत निवडूण आले आहेत.

अशोक चव्हाण भाजपात गेले आहेत तर येणाऱ्या काळात हे तीन आमदार भाजपात जाऊ शकतात. त्यामुळे काँग्रेससाठी येणार काळ खडतर असणार आहे‌‌. भास्करराव पाटील खतगावकर हे मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांची नायगाव, देगलूर मुखेड या भागात चांगली पकड आहे. या भागात काँग्रेसला पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

नांदेड जिल्ह्यात बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समितीत्या काँग्रेसकडे आहेत. या समितीत्यांचे सभापती व संचालक अशोक चव्हाण व खतगावकर यांचे समर्थक आहेत. हे संचालक व सभापती चव्हाण यांच्यासोबत गेले तर काँग्रेसमध्ये कोण राहणार ? असा प्रश्न आहे. नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला नेता नाही, पदाधिकारी नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने जिल्हा काँग्रेसमुक्त होण्याच्या मार्गावर आहे.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT