Vasantrao Kale Sugar Factory elections
Vasantrao Kale Sugar Factory elections  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pandharpur NCP News : कल्याणराव काळेंचे टेन्शन वाढले : अभिजित पाटलांचा काळे कारखान्यासाठीही शड्डू; समर्थकांचे मिरवणुकीने अर्ज दाखल

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील भाळवणी येथील वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (ता.१८) २१ जागांसाठी २४२ जणांनी २६८ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील आणि डॉ. बी. पी. रोंगे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज वाजतगाजत अन नाचत येऊन उमेदवारी अर्ज दाखल केले. अभिजीत पाटील यांनी उमेदवार बसलेल्या ट्रॅक्टरचे सारथ्य केले. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रांत कार्यालयादरम्यान रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. अभिजीत पाटील यांनी ही निवडणुक प्रतिष्ठेची केल्याने निवडणुकीतील चुरस आणखी वाढली आहे. (Abhijeet Patil will contested in Vasantrao Kale Sugar Factory elections)

वसंतराव काळे साखर कारखान्याची निवडणुक काळे विरुध्द पाटील-रोंगे-पवार अशी अटीतटीची होणार, असे सध्याचे चित्र आहे. अर्ज छाननीमध्ये किती जणांचे उमेदवारी अर्ज नामंजूर होतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

वसंतराव काळे साखर कारखान्यावर (Sugar Factory) मागील २२ वर्षांपासून सत्ताधारी कल्याणराव काळे गटाचे एकहाती वर्चस्व आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच मोठी चुरस निर्माण झाली आहे. वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी अभिजीत पाटील हे स्वतः मैदानात उतरले आहेत. दुसरीकडे बी. पी. रोंगे, दीपक पवार यांनीही काळे यांच्या विरोधात रान पेटवण्यास सुरवात केली आहे.

निवडणुकीपूर्वीच काळे आणि पाटील गटात शह काटशहाचे राजकारण सुरु झाले आहे. पाटील गटाकडून उमेदवारी अर्ज भरलेल्या बी. पी. रोंगे, धनंजय काळे यांचे काळे कारखान्याचे येणे बाकीचे दाखले अडविले आहेत, तर अभिजीत पाटील यांनीही कल्याणराव काळे यांचा विठ्ठलचा दाखल रोखला आहे. सध्या येणे बाकीच्या दाखल्याचे राजकारण जोरात सुरु आहे. उद्या उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. त्यामुळे दाखल्याचे राजकारण कुठपर्यंत पोचणार, याचीही उत्सुकता लागली आहे.

कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) यांनी दोन दिवसांपूर्वी मोटारसायकल रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर बुधवारी राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. गुरुवारी शेवटच्या दिवशी अभिजीत पाटील यांच्या समर्थकांनाही मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल केले. वसंतराव काळे साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने पंढरपूर तालुक्याचे राजकीय वातावरण तापले आहे.

कारखान्याच्या सर्व जागा जिंकू : अभिजीत पाटील

विठ्ठल साखर कारखान्याप्रमाणेच वसंतराव काळे साखर कारखान्याच्या निवडणुकीतही सर्व जागा मोठ्या मतांच्या फरकाने जिंकून आणू, असा विश्वास अभिजीत पाटील यांनी आज व्यक्त केला. अभिजीत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज त्यांच्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी काळे साखर कारखान्यात परिवर्तन होणार, असा ठाम दावा ही केला आहे.

दोन दिवसांपूर्वी कल्याणराव काळे यांनी विरोधकांना एकही जागा देणार नाही, ज्यांना निवडणूक लढवायची त्यांनी लढावावी, असे खुले आव्हान दिले होते. त्यावर बोलतानाअपाटील म्हणाले की, आम्ही तडजोड करण्यासाठी निवडणूक लढवत नाही. आतापर्यंत एकदाही आम्हाला जागा द्या; म्हणून त्यांच्याशी चर्चा करायला गेलो नाही. उलट निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अभिजीत पाटलांना सांगा, असे शरद पवारांना सांगितले जाते. यावरून स्पष्ट झाले आहे की, काळे यांचा पाय किती खोलात गेला आहे. आम्हाला एक -दोन नव्हे; तर सर्वच्या सर्व जागा पाहिजेत. आम्ही निवडणुकीत जिंकून दाखवू, असेही पाटील यांनी ठणकावून सांगितले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT