Sangli, 16 August : मघा काहींनी (रोहित पवार यांना नाव न घेता उद्देशून) सांगितलं की, दादाचं गावकीकडं लक्ष आहे, जरा भावकीकडंही लक्ष द्या. अरं भावकीकडं लक्ष दिलं; म्हणूनच तू आमदार झालास. जयंतराव त्याला विचारा, किती मतं पडली आहेत, पोस्टल बॅलेटवर आला आहात आपण, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांना लगावला.
महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या वतीने सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात एन. डी. पाटील विधी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील, जयंत पाटील, रामशेठ ठाकूर, रोहित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.
दरम्यान, रोहित पवार यांच्याबाबत अजितदादांनी दुसऱ्यांदा हे विधान केले आहे. यापूर्वीही एकदा जाहीर कार्यक्रमात असेच विधान केले होते. माझी सभा झाली नाही म्हणून तू वाचलास बेटा...चल पाया पड, असे ते रोहित पवार (Rohit Pawar) यांना उद्देशून बोलले होते. त्यावर विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आक्षेप घेत अजित पवारांवर आरोप केले होते. ते वादळ शांत होत नाही तोच अजित पवारांनी पुन्हा एकदा त्यावर भाष्य केले आहे.
अजितदादा म्हणाले, मी, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, आर. आर. पाटील असे आम्ही १९९० पासून १९९९ पर्यंत ज्युनिअरच होतो. १९९९ मध्ये सरकार स्थापनेच्या वेळी खूप दिवस असेच वाया चालले होते. त्यावेळी काय करायचे म्हणून आम्ही चौघे मेट्रो स्टेशनजवळील चित्रपटगृहात जाऊन कुठलातरी चित्रपट पाहत होतो.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते जसं सांगतील तसं आपण करायचं, असं आम्ही ठरवलं होतं. आमच्या १९९०, १९९५ आणि १९९९ अशा तीन टर्म आमच्या झाल्या होत्या. त्यानंतर २००४ मध्ये आमची कुठं विचारपूस करायला लागले हेाते. पण काही जणांना वाटतं की, पहिल्या टर्मलाच आपण मोठं झालं पाहिजे. मी भाषण केलं पाहिजे, असा टोला त्यांनी रोहित पवारांना लगावला.
ते म्हणाले, मी माझ्या पक्षाचे काम करतो, जयंतराव पाटील त्यांच्या पक्षाचे काम करतात. पण माझ्या पक्षात मी काय करावं, याचे दुसरेच सल्ले देऊ लागले आहेत. मला तर काहींचं कळतंच नाही. तुमचं तुम्ही बघा ना, आमचं आम्ही बघू ना काय करायचं आणि काय करायचं नाही. त्यामुळे माझ्या कोणी नादी लागू नका. तुम्ही तुमचं काम करा, मी एक अक्षर बोलणार नाही.
जयंतराव, मी जेव्हापासून महायुतीसोबत गेलो आहे, तेव्हापासून मी तुमच्या कोणावर कधी टिकाटिपण्णी केली आहे का. काय कारण आहे. तुम्ही तुमच्या विचाराने चालला आहात, मी माझ्या विचाराने चाललो आहे. शेवटी आपल्या सर्वांना महाराष्ट्राचा सर्वांगीण विकासच साध्य करायचा आहे. शिव, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेशी आम्ही कुठेही तडजोड करत नाही, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
माझं नशीब लय चांगलंय; कसं का होईल जुळूनच येतंय
उपमुख्यमंत्री म्हणाले, व्यासपीठावरील सर्वांची भाषण होत होती, तसं माझं सणकत चाललं होतं. मला रोहितने सांगितलं की, जयंतरावाचं बारा वाजता हेलिकॉप्टर आहे, मला त्यातून जायचं आहे. मी म्हटलं आर्रऽऽ र्रऽ, माझं भाषण ऐकायला नेमकं हे दोघे नाहीत. मी काय बोलायचं हे ठरवलं होतं. पण हे बोलून निघून गेले, परंतु ते परत आले. माझं नशीब लय चांगलं आहे, कसं का होईना ते जुळूनच येतंय.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.