Devendra Fadnavis-Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mangalvedha Upsa Sinchan : ‘फडणवीसांना ‘त्या’ आश्वासनाची आठवण करून देतो; लोकं आता वाट बघत आहेत’

Vijaykumar Dudhale

Solapur News : मंगळवेढा उपसा सिंचन योजनेवरून पुन्हा एकदा राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. याबाबत सोलापूर दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी यासंदर्भात बोलतो. त्यांनी पोटनिवडणुकीत आश्वासन दिलं होतं, त्याची त्यांना आठवण करून देतो,’ असे सांगितले. (Ajit Pawar's finger to Devendra Fadnavis regarding Mangalvedha Upsa Irrigation Scheme)

सोलापूर जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांना मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांनी आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. तसेच, या गावांनी आम्हाला कर्नाटकात जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पवार म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी चर्चा करेन. जलसंपदा खातं सध्या त्यांच्याकडेच आहे. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना फडणवीस यांनी मंगळवेढा उपसा सिंचन योजना मंजूर करण्यात येईल. या योजनेला केंद्रातून निधी देण्याबाबत आश्वासन दिलं होतं. हे मी त्यांच्या लक्षात आणून देतो, लोकं आता त्या आश्वासनाची पूर्तता करण्याची वाट बघत आहेत, असेही सांगेन.

काय आहे प्रकरण?

मंगळवेढा तालुक्यातील 35 गावे शेतीच्या पाण्यापासून वंचित होती. या गावांना मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून उजनी धरणाचे पाणी मिळावे, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. मात्र, या शेतकऱ्यांना निवडणुकीत फक्त आश्वासनाचे गाजर दाखवले जाते. लोकसभेच्या 2009 च्या निवडणुकीत 35 गावांनी याच मुद्यावरून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी 10 गावांमधून एकही मतदान झाले नव्हते, तर 12 गावांत अल्प प्रमाणात मतदान झाले होते.

त्या निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले. तालुक्यातील 35 मधील 11 गावांना म्हैसाळ योजनेत समाविष्ट करण्यात आले, उर्वरित 24 गावांसाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर-मंगळेवढ्याचा आमदार भाजपचा करा; मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मंजुरी आणि केंद्रातून पैसा उपलब्ध केले करतो, असे आश्वासन दिले होते. मात्र त्याची अमंलबजावणी न झाल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वी सिंचन योजनेला मंजुरी द्यावी;अन्यथा आगामी लोकसभेसह विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय 24 गावांनी घेतला आहे. तसेच, पाणी न दिल्यास आम्हाला कर्नाटकात जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT