Bhagirath Bhalke
Bhagirath Bhalke  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mangalveda Politics: पीए बदलून भालकेंची माणसं फुटायची नाहीत; गड्या तुला ते जमणार नाही, भगीरथ भालकेंचा आमदार आवताडेंना टोला

हुकूम मुलाणी

Mangalveda : पीए बदलून काय होणार नाही, त्यासाठी मानसिकता आणि विचारसरणी बदलण्याची गरज आहे. लोकसेवक म्हणून तुम्हाला जनतेने निवडून दिलेले आहे. त्यांना वाटलं पीए बदलला; म्हणून भालके गटाची माणसं बदलतील फुटतील. अनेक वर्षांची निष्ठा, अस्मिता ऋणानुबंध भारतनानांनी जोडला आहे. तो पीए पळवून संपणार नाही. गड्या तुला हे जमणार नाही, असा सूचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते भगीरथ भालके यांनी नाव न घेता भाजप आमदार समाधान आवताडे यांना दिला. (Bhagirath Bhalke criticizes BJP MLA Samadhan Awatade)

मंगळवेढा (Mangalveda) तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये अधिकाऱ्याकडून होत असलेल्या अडवणुकीबाबत सत्ताधारी भाजप व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह समविचारी आघाडीच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत भालके बोलत होते. काही महिन्यांपूर्वी भालके यांचा पीए आमदार आवताडे यांनी पळविला होता. त्याला भालके यांनी उत्तर दिले आहे.

भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभव खुल्या मनाने स्वीकारून मी दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो. पण, दोन वर्षातील कामाची पद्धत, जनतेला होत असलेला त्रास लक्षात घेता गोरगरीब जनतेला छळण्याचे काम अधिकारी करत आहेत. लोकशाही पद्धतीने दोन वर्षे शांत होतो. यापुढील काळात गोरगरिबांच्या केसाला धक्का लागला, तर हा भगीरथ काळ म्हणून उभा राहील असा इशाराही त्यांनी दिला.

दुष्काळी गावाला नसलेले पाणी प्रत्यक्षात कागदावर आणण्याचे काम भारतनानांनी केले. याच शेतीच्या पाण्यासाठी लोकप्रतिनिधी विधानसभा हलवून ठेवायला हवी होती. पण एकदाच प्रश्न उपस्थित करून आठवड्यात मंजुरी देतो. या आश्वासनावर आमदारांनी स्वतःचा सत्कार करून श्रेय घेतले. मंगळवेढा तालुक्यातील ६५ छावण्याची बिले तीन वर्षांनंतरही दिली जात नाहीत. छावणी चालकांनाही वेठीस धरण्याचे काम होत आहे, असा आरोपही भगीरथ यांनी केला.

महात्मा बसवेश्वरांचे राष्ट्रीय स्मारक रखडले आहे. मंगळवेढा शहर विकास आराखड्याला प्रशासक म्हणतात कुणी केले माहीत नाही. तर मुख्याधिकारी गाणी म्हणण्यात व्यस्त आहेत, त्यामुळे शहरवासीयांना देशोधडीला लावण्याचे काम या आराखड्यातून सुरू आहे.

राहुल शहा म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत कोणत्याही शासकीय कार्यालयातील काम सहजरित्या होत नाही. संत दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील म्हणाले की, सीमावर्ती भागातून कामासाठी आलेल्या तालुक्यातील जनतेला वेठीस धरण्याचे काम प्रशासन करीत आहे. हा अन्याय चालूच ठेवला, तर भविष्यात कुलुप लावण्याचा इशाराही दिला.

अजित जगताप म्हणाले की, शासकीय कार्यालयातील पिळवणुकीवर त्यांना जाब विचारणारे कोण नाही. श्रेयावरून नाट्यगृहाचे काम रखडवून ठेवले. प्रमुख प्रश्नाला निधी आणण्याऐवजी सोयीच्या कामाला निधी मिळवला. शहरातील लोक बेघर होत असताना लोकप्रतिनिधी गप्प आहेत.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर कौंडुभैरी म्हणाले की, मंगळवेढा शहरातील तहसील, पंचायत समिती, नगरपालिका या शासकीय कार्यालयात नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. विशेषत: तहसील कार्यालयात आस्थापना शाखेत मोठ्या प्रमाणात त्रास होतो, हे अधिकाऱ्यांना ठणकावून सांगण्याची गरज आहे.

पोलिसांच्या विरोधात आवाज उठविल्यावर गुन्हेगार ठरविले जाते. शासकीय अधिकाऱ्याची मुजोरी वाढली आहे. औदुंबर वाडदेकर यांनी देखील अधिकाऱ्यांची तालुक्यात मनमानी वाढली आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे, त्यांच्या वर्तनात सुधारणा होणार नसेल तर आणखी मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT