Bidri sugar factory Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bidri Sugar Factory : 'बिद्री' निवडणुकीनिमित्त भाजप, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी नेत्यांविरोधातच थोपटले दंड!

Rahul Gadkar

Kolhapur News : राज्यात सर्वात जास्त सभासद असलेल्या श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर (बिद्री) कारखान्याच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. बिद्रीच्या निवडणुकीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन मंत्री, दोन खासदार, दोन आमदार आणि अर्धा डझन आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्ह्यात चार ते पाच तालुक्यात बिद्री कारखान्याचा विस्तार असल्याने अनेकांनी विधानसभेची पेरणी सुरू केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बिद्री कारखान्याची निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच इतक्या इर्षेने पार पडत आहे. सर्वात महत्त्वाचे या निवडणुकीत पहिल्यांदाच राजकीय पक्षाचा हस्तक्षेप गडद दिसल्याचे चित्र आहे.

पुन्हा एकदा बंटी-मुन्ना आमनेसामने

तर दुसरीकडे बिद्रीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा बंटी-मुन्ना आमनेसामने आले आहेत. बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत सतेज पाटील आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी एकत्र येत खासदार धंनजय महाडिक, संजय मंडलिक यांच्या विरोधात आघाडी केली आहे.

पक्षीय राजकारणापेक्षा मंत्री हसन मुश्रीफ व आमदार पाटील यांनी आपली मैत्री जपली आहे. पण मंत्री मुश्रीफ यांना मित्र खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधात लढावे लागणार आहे. खासदार धंनजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर यांनी एकत्र येत पॅनेल उभे केले आहे.

सत्ताधारी यांची महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी असून, त्यामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव, माजी आमदार केपी पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी आमदार बजरंग आण्णा देसाई यांचा समावेश आहे.

तर राजर्षी छत्रपती शाहू शेतकरी विकास परिवर्तन आघाडीत उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार अमल महाडिक, ए. वाय. पाटील, भाजप नेते समरजित घाटगे यांचा समावेश आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष भाजप नेत्यांच्या विरोधात

बिद्री कारखान्याच्या निवडणुकीमुळे अनेक राजकीय गटात खळबळ उडाली आहे. एकमेकांच्या सोयीच्या राजकारणामुळे अनेकांनी आपल्या नेत्यालाच ठेंगा दाखवला आहे. एकीकडे भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात पॅनेल उभे केले असताना भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई मात्र सत्ताधारी आघाडीला जाऊन मिळाले आहेत. स्थानिक राजकारणामुळे त्यांनी माजी आमदार के पी पाटील यांच्याशी हात मिळवणी केली आहे.

राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी नेत्यांच्या विरोधात

दुसरीकडे मागील वेळी सत्तेत असलेल्या माजी आमदार के. पी. पाटील यांच्याशी फारकत घेऊन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी विरोधी परिवर्तन पॅनेलबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. ए वाय पाटील हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अपयश आले.

राजकारण आणि सहकारात जपतात मैत्री

कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण नेहमीच राज्यात चर्चेचा विषय ठरते. सहकार आणि राज्यातील राजकारण वेगवेगळे पाहायला मिळते. बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत हेच चित्र आहे. राज्यातील सत्तेत सध्या पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील हे विरोधक असले तरी सहकारात त्यांनी आपली मैत्री जपली आहे.

तर दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील हे स्थानिक राजकारणामुळे सहकारात वेगळी भूमिका घेत असताना दिसतात.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT