Satara, 28 June : खासदार उदयनराजे भोसले यांच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ला पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने अखेर मंजुरी दिली आहे, त्यामुळे सातारा जिल्ह्यात नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांचा महत्वकांक्षी प्रकल्प मंजूर करून भाजपला साताऱ्यात आणखी भक्कम करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सातारा जिल्ह्यात सध्या पर्यटनाच्या दृष्टीने विविध योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचा डोम धरणातील सी प्लेन सेवा हा महत्वकांक्षी प्रकल्प होता. या प्रकल्पासाठी उदयनराजे भोसले यांनी 2024 मध्ये केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते, त्यापूर्वीही त्यांनी ही सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले होते. ते केवळ मोहोळ यांना निवेदन देऊन थांबले नाहीत, तर ही सेवा सुरू करण्यासाठी गेली वर्षभर पाठपुरावा केला. खेर त्यात त्यांना यश आले आहे. केंद्र सरकारच्या उड्डाण 5.5 या महत्वकांक्षी योजनेतून ही सेवा सुरू होणार आहे त्यामुळे महाबळेश्वर, तापोळ्यापाठोपाठ आता धोम धरणातही सी-प्लेन सेवा सुरू होणार आहे.
सुमारे वीस चौरस किलोमीटरच्या धोम धरणातून (Dhom Dam) उड्डाण किंवा पाण्यावर उतरणारी सी-प्लेन सेवा सुरू करण्याबाबत उदयनराजे यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. उदयनराजे यांच्या पाठपुराव्याला सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत उड्डाण 5.5 या महत्वकांक्षी योजनेतून धोम धरणातील सी प्लेन सेवा सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
धोम धरणातील सी प्लेन योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्र सरकारचे सोशल माध्यमातून आभार मानले आहेत. त्यात त्यांनी ‘पर्यटनवाढीचा नवा अध्याय, सातारा लोकसभा मतदारसंघासाठी अभिमानाची बातमी. धोम धरणावरून आकाशात भरारी घेणाऱ्या सी प्लेन सेवेची आता लवकरच सुरुवात होणार,’ असे म्हटले आहे.
सातारा जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी आम्ही केलेल्या पाठपुरायला यश आले असून धोम धरणातून सी प्लेन सेवा केंद्र सरकारच्या उड्डाण 5.5 या योजनेतून सुरू करायला मान्यता दिली आहे. या सेवेमुळे सातारा जिल्ह्याच्या पर्यटनाला नवी उंची मिळाला असून येथील निसर्गसंपन्न, ऐतिहासिक वारसा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. केंद्र सरकारचे या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आभार. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आमचा ठाम प्रयत्न या पुढेही सुरू राहील, असेही उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठरणार महत्वपूर्ण
सातारा जिल्ह्यात महायुतीचे सर्वाधिक आमदार आहेत. त्यातही भाजपच्या आमदारांची संख्या मोठी आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय भाजपच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे. तसेच, पक्षवाढीसाठीही त्याचा फायदा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मूळगाव असल्याने त्यांनी साताऱ्यात सध्या विविध प्रकल्प सुरू केले आहेत.
वांद्रे-वरळी सी लिंकच्या धर्तीवर पूल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यात नवीन महाबळेश्वर वसविण्याचा ध्यास घेतला आहे. या नवीन महाबळेश्वरमध्ये अनेक प्रकल्प आणि सुविधांचा समावेश असणार आहे. त्याच्या अंमलबजावणीलाही सुरुवात झाली असून शिवसागर जलाशयाच्या आतील गावांना तापळा महाबळेश्वरशी जोडणाऱ्या केबल स्टॅन्ड पुलाचे कामही वेगाने सुरू आहे. वांद्रे-वरळी सी लिंकच्या धर्तीवर या पुलाचे काम असणार आहे, याशिवाय या पुलावर प्रेक्षा गॅलरीही असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.