Mahayuti Leader-Majhi Ladki Bahin Yojana Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahayuti Dispute : सुरेश खाडेंनी राष्ट्रवादीला दाखवला ‘कात्रजचा घाट’; संजय गांधी निराधारपाठोपाठ ‘लाडकी बहीण योजने’तही डावलले

Vijaykumar Dudhale

Sangli, 26 July : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये श्रेयवादाचा संघर्ष सुरू झाला आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर अशासकीय समित्या स्थापन करून त्यावर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पदाधिकाऱ्यांना संधी दिली जात आहे.

सांगली जिल्ह्यात मात्र पालकमंत्री सुरेश खाडे यांनी राष्ट्रवादीला डावलून केवळ भाजप आणि एकनाथ शिंदे गटालाच संधी दिली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी पसरली असून पक्ष पदाधिकाऱ्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्र लिहून तक्रार करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Majhi Ladki Bahin Yojana ) घोषणा केली आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंतचे आहे, अशा कुटुंबातील 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिलांना प्रतिमहिना दीड हजार रुपये या योजनेतून मिळणार आहेत. राज्यात सर्वत्र ही योजना राबविण्यात येत आहे, त्यासाठी तालुका स्तरावर अशासकीय समित्या स्थापन करण्यात येत आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविण्यासाठी स्थापन करण्यात येत असलेल्या समित्यांमध्ये सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना संधी दिली जात आहे. मात्र, सांगलीत (Sangli) पालकमंत्री सुरेश खाडे राष्ट्रवादी काँग्रेसला संपूर्णपणे डावलण्यात आलेले आहे. यापूर्वीही संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्य निवडीत अजित पवार गटाला डावलण्यात आल्याचे पक्षाचे सरचिटणीस अविनाश चोथे यांनी सांगितले.

आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अशासकीय समितीवर संधी मिळत नसल्याची तक्रार त्यांनी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

राज्याच्या महिला व बालविकास विभागातर्फे ‘माझी लाडकी बहीण योजना’ घोषित करण्यात आली आहे. ही योजना राबवण्यासाठी तालुका स्तरावर समिती स्थापन करण्याच्या आदेश त्यात नमूद करण्यात आला आहे. या समितीत अशासकीय सदस्य अध्यक्ष असावा व दोन सदस्य नेमावेत, असेही सांगण्यात आलेले आहे.

सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी याबाबत 19 जुलै रोजी समिती स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात केवळ भाजप आणि शिवसेना सदस्यांचा समावेश आहे. या समितीतून राष्ट्रवादी काँग्रेसला डावलण्यात आलेले आहे. वास्तविक तीन पक्षांची सत्ता असताना या समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला डावलण्यात आले आहे. याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

सरचिटणीस अविनाश चौधरी यांनी सांगितले, सांगली जिल्ह्यात सर्वत्र भाजप आणि खानापूर तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचा अध्यक्ष व सदस्य नेमण्याबाबत पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पत्र दिले आहे. या समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला कुठेही स्थान देण्यात आलेले नाही.

लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजय पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी कार्यकर्त्यांसह प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. त्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने भाजपविरोधात काम केले आहे, असे असतानाही शिवसेनेला संधी देण्यात आली आहे. मात्र प्रामाणिक काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला समित्यांमधून डावण्यात आले आहे.

याबाबत पक्षाच्या सांगली जिल्हा पदाधिकाऱ्याकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी यापूर्वी संजय गांधी निराधार योजनेच्या समितीच्या निवडीतही राष्ट्रवादी काँग्रेसला डावलेले आहे. आता लाडकी बहिणी योजनेतही पुन्हा डावण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT