Mangalwedha Congress Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Congress Politics : दुष्काळी सवलतीत निवडक शेतकऱ्यांनाच लाभ; काँग्रेसच्या गंभीर आरोपाने खळबळ

हुकूम मुलाणी

Solapur Political News : दुष्काळी तालुक्यात मंगळवेढ्याचा समावेश करावा, यासाठी काँग्रेसचे प्रयत्न आहेत. परंतु शासनाने तालुक्याला 'ट्रिगर वन' मधील निकष लावले नाहीत. नवे निकष लावत तालुक्यातील निवडक शेतकऱ्यांनाचा लाभ दिला जात आहे. परिणामी गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदतीतून वगळल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. आता सरसकट शेतकऱ्याच्या बँक खात्यावर मदत जमा व्हावी, यासाठी मंगळवेढा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी दिला आहे. (Latest Political News)

तालुकाध्यक्ष साळे म्हणाले, 'तालुक्याच्या आर्थिक विकासात भर देणारे चोकोबा आणि बसवेश्वर स्मारकाचा प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित आहेत. परिणामी तालुक्यामध्ये नवे रोजगार निर्माण होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे नवोदित व्यवसायभिमुख तरुणांना स्थलांतरित व्हावे लागत आहे. तालुक्यातील मंगळवेढा उपसा सिंचन योजना, महात्मा बसवेश्वर व चोकोबा स्मारक या प्रश्नासाठी आम्ही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, याचे श्रेय काँग्रेसला मिळेल म्हणून याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे.'

दुष्काळी तालुक्याचा दावा फसवा

'सोलापूर लोकसभा मतदारसंघ दुष्काळी तालुक्यातून वगळण्यात आला होता. यामध्ये नव्याने दुष्काळात समावेश करताना ज्या आठ सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यातील अनेक सवलतींपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव आहे. तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून, शेतकऱ्यांनी खरिपातील पेरणीसाठी केलेला खर्च वाया गेला आहे. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहे. या दुष्काळ सवलतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरीप व फळपिकासाठी आर्थिक मदत सरसकट देणे आवश्यक आहे. परंतु तसे आश्वासन नव्या शासन निर्णयामध्ये देण्यात आले नाही. त्यामुळेच तालुक्याला दुष्काळी म्हणून जाहीर केल्याचा दावा हा फसवा आहे', अशी टीकाही साळे यांनी केली. (Maharashtra Political News)

सरकारविरोधात आंदोलन छेडणार

सरकारच्या कुटील डावामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा दुष्काळ तालुक्यात मिळणाऱ्या योजनेपासून वंचित राहणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या माध्यमातून पूर्ण साेलापूर मतदारसंघात काँग्रेस नेत्या आमदार प्रणिती शिंदे व जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभा करणार आहोत. सध्या सत्ताधारी पक्षाने लोकशाही धोक्यात आणली आहे. मात्र, हीच लोकशाही टिकवण्याची जबाबदारी माध्यमाची आहे. यापूर्वी काही प्रश्नावर काँग्रेसने आंदोलन केल्यानंतर सरकारला त्या प्रश्नाची दखल घ्यावी लागली होती. आता श्रेयासाठी ते प्रश्न तसेच थांबवून ठेवण्यात आल्याचा आरोपही तालुकाध्यक्ष साळेंनी या वेळी केला आहे.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीने पत्रकारांशी वार्तालाप करण्यात आला. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष शिवशंकर कवचाळे, ओबीसी तालुकाध्यक्ष पांडुरंग माळी, विष्णू शिंदे, दिलीप जाधव, मारुती वाकडे, भीमराव मोरे, बापू अवघडे, सुनीता अवघडे, संदीप पवार, शहाजी कांबळे, आकाश भोसले, संतोष शिरसागर, अविनाश मुंगसे, रवी काटे, नागेश आकळे, संदीप पवार आदी उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT