Makarand Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Political News : मकरंद पाटील यांच्या अकार्यक्षमतेमुळे तीन तालुक्यांचा विकास खुंटला..!

Umesh Bambare-Patil

Satara Political News: वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांच्या अकार्यक्षमतेमुळे मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांचा विकास खुंटला आहे. येथे गुन्हेगारी, झुंडशाही बोकाळली आहे. त्यामुळे येथील जनता अनेक पातळ्यांवर भरडली जात आहे, अन्याय सहन करत आहे. त्यामुळे ते आमदार म्हणून फेल ठरले आहेत, असे आरोप करत मतदारसंघातील सर्वपक्षीय युवक नेत्यांनी एकत्र येवून रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे.

खंडाळा (Khandala) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा युवक काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष विराज शिंदे, भाजपचे (BJP) प्रदेश सरचिटणीस अनुप सूर्यवंशी, भाजपाचे ऋषिकेश धायगुडे-पाटील, हर्षवर्धन शेळके-पाटील, धनजी डेरे, अतुल पवार, कॉंग्रेसचे ऋषिराज मोहिते, वसीम फरास आदी मकरंद पाटील यांच्याविरोधात एकवटले आहेत.

यावेळी विराज शिंदे म्हणाले, आमदार मकरंद पाटील (Makarand Patil) यांना येथील जनतेने ज्या अपेक्षांने विश्वास टाकून तीन टर्म निवडून दिले. त्याच जनतेचा अपेक्षाभंग त्यांनी केला आहे. मतदारसंघातील एकही महत्त्वाचा प्रश्न ते गेल्या तीन टर्ममध्ये ते सोडवू शकले नाहीत. विधानसभेत मौन धारण करून ते बसत आहेत, तर मतदारसंघातील एकही प्रश्नावर ते एकदाही बोलले नाहीत किंवा एकही लक्षवेधी सूचना त्यांनी मांडली नाही.

रस्ते, सभा मंडप, लग्न, बारशी करणे म्हणजे विकास नव्हे. विकासाची व्हिजन (ब्लू प्रिंट) लागते ती त्यांच्याकडे नसल्याने या तीनही तालुक्यांचा विकास खुंटला आहे. अनुप सूर्यवंशी म्हणाले, शिरवळ परिसरात गुन्हेगारी वाढली आहे. पंढरपूर फाट्यावरील मोठ्या इमारती तडीपार गुन्हेगारांचे अक्षरशः सुरक्षित माहेरघर बनले आहे. हे पोलिस यंत्रणेलाही माहिती आहे. गोपनीय खाते त्याबाबत काहीच करत नाही. तेथे अवैद्य धंदे व देहविक्रीचा व्यावसायही राजरोजपणे सुरु आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ऋषिकेश धायगुडे-पाटील म्हणाले, सरकारच्या धोरणानुसार 1983 मध्ये सुरू झालेला खंडाळ्याचा दूध संघ बंद होण्याच्या मार्गावर असताना आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नामुळे वाचला. मात्र लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक आमदार मकरंद पाटील यांनी दूध संघ वाचवण्यासाठी पुढे येवून काप्रयत्न केला नाही, हा प्रश्न आहे. ते सातत्याने खंडाळ्याच्या बाबतीत दुजाभाव करत आहेत.

धनाजी डेरे म्हणाले, खंडाळ्याचा साखर कारखाना आमदार मकरंद पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या ताब्यात येथील सभासदांनी विश्वासाने दिला. पण येथील ऊस उत्पादकांची फसवणूक होत आहे. वाईच्या कारखान्याला 3 हजारांचा भाव जाहीर केला. पण खंडाळ्याच्या कारखान्याचा अद्याप भाव जाहीर केला नाही. चालू हंगामात ऊसतोड यंत्रणा 13 कोटी देऊन सज्ज ठेवली म्हणून सांगितले. पण प्रत्यक्ष यंत्रणाच कमी आहे.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT