Abhayshinh Jagtap
Abhayshinh Jagtap Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madha Lok Sabha : ‘कालपर्यंत RSSचा प्रचार करणारे आज गांधीवादी कसे झाले?’ अभयसिंह जगतापांचा राष्ट्रवादीला खडा सवाल

दत्तात्रय खंडागळे

Solapur, 13 April : माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेले अभयसिंह जगताप यांना डावलून पक्षाने धैर्यशील मोहिते पाटील यांना तिकिट देण्याचे निश्तिच केले आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून लंगोट बांधून तयार असलेल्या जगतापांनीही माढ्यातून अपक्ष निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. तसेच, ‘कालपर्यंत आरएसएसचा प्रचार करणारे आज लगेच गांधीवादी कसे झाले?’ असा सवाल त्यांनी मोहिते पाटील यांच्या उमेदवारीवरून पक्षाला विचारला आहे.

भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) तुतारी हाती घेतली आहे. या मतदारसंघातून अभयसिंह जगताप (Abhayshinh Jagtap) हे लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होते. त्यांनी गेली सहा महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीची तयारी केली होती. मात्र, पवारांनी ऐनवेळी मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे माढ्यतील इच्छूक अभयसिंह जगताप हे नाराज झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पवारांकडून डावलण्यात आल्यानंतर जगताप यांनी माढा लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. राष्ट्रवादीच्या तिकिटाबाबत जगताप म्हणाले, मोहिते पाटील यांना भाजपने तिकीट नाकारले, त्यामुळेच ते तिकिटासाठी पक्षप्रवेश करत आहेत. कालपर्यंत आरएसएसचा प्रचार करणारे आज लगेच गांधीवादी कसे झाले? असा सवालही जगताप यांनी केला.

फुले, शाहू, आंबेडकरांची विचारधारा सांगणाऱ्या पक्षाची बटण दाबल्यासारखी लगेच विचारधारा कशी बदलू शकते, हे कळत नाही. विचारधारेमध्ये बदल होण्यासाठी खूप कालावधी जावा लागतो. पण, ज्यांच्याकडे कारखाने आहेत, त्यांनाच पक्ष उमेदवारी देणार आहे का? देवेंद्र फडणवीस यांचे आमच्यावर उपकार आहेत, असे त्यांच्या कुटुंबातील सदस्य आजही सांगत आहेत. अशाच लोकांना त्यांना उमेदवारी का, असा सवालही जगताप यांनी विचारला.

भारतीय जनता पक्षातून आलेल्यांना उमेदवारी देणे, हे पक्षाच्या विचारसरणीला धरून नाही. पडत्या काळात आम्ही पक्षाचे काम नेटाने केले. त्यावेळी आता उमेदवारीसाठी धडपडणारे दुसऱ्या पक्षाचे काम करत होते. त्यांनाच आता पुन्हा पक्षातून उमेदवारी दिली जात असेल तर आम्ही शांत का बसावे? उमेदवारी देताना आम्हाला विश्वासात घेतलेले नाही. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच उमेदवारी दिली जात असेल तर ते अन्यायकारक आहे, अशी खंतही अभयसिंह जगताप यांनी बोलून दाखवली.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT