Raju Shetti  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : ‘मी आता कुणाच्याच पंगतीला बसणार नाही; लोकसभेचे मैदान शेतकऱ्यांच्या जिवावर मारणार’

Anil Kadam

Sangli News : मी कुणाच्याच पंगतीला बसणार नाही. जो-तो आपल्या सोयीचे राजकारण करत आहे. कोण कुठे आहे, हेच समजत नाही. त्यापेक्षा माझा शेतकरीच बरा. लोकसभा निवडणूक ही शेतकऱ्यांच्या जिवावर लढणार आहे. कोणत्याच पक्षाचा पाठिंबा घेणार नसल्याचा ठाम निर्णय असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. (Hatkanangle Lok Sabha Constituency)

माजी खासदार राजू शेट्टी यांनी चिकुर्डे, ऐतवडे खुर्द, कुरळप, बहादुरवाडी, कोरेगाव, ढवळी (ता. वाळवा) या गावांचा संपर्क दौरा केला. त्यावेळी शेट्टी म्हणाले, ‘‘महाविकास आघाडी महायुतीतील पक्षांनी उमेदवारीसाठी मला गळ घातली आहे. पण, दोन्ही पक्षांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. जो-तो आपल्या सोयीचे राजकारण करत आहे. कोण कुठे आहे, हेच समजत नाही, त्यापेक्षा माझा शेतकरीच बरा. ऊस आंदोलनामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पंधरा लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 650 कोटी रुपये मिळवून दिले. (Raju Shetti News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मागील अडीच महिन्यांपासून माझा संपर्क दौरा सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मला माझे शेतकरी बांधव निवडून आणणारच आहे. ‘एक नोट, एक व्हाेट’ या तत्त्वावर माझा ठाम विश्वास असल्याचे त्यांनी बोलून दाखवले, त्यामुळे या निवडणुकीत माझ्यासमोर कोणताही खासदार उभा असला तरी काही फरक पडणार नसल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले. (Marathi Political News)

शेट्टी म्हणाले, ऊस आंदोलनात माझ्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर शकडो गुन्हे दाखल झाले आहेत. तरीसुद्धा मी डगमगलो नाही. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान हमीभासाठी हजाराे शेतकरी चालून गेले. काही आंदोलक मरण पावले. मात्र, भाजप सरकारला बघायला वेळ नाही.

भाजप सरकारने साखर, कांदानिर्यात बंदी घातली आहे, त्यांनी अजूनही निर्यातबंदी उठवलेली नाही, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. सरकारने निर्यातबंदी उठवली असती तर मोठ्या प्रमाणात कांदा देशाबाहेर गेला असता. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला असता. फायदा फक्त कांदा दलालांचा झाला आहे, असा आरोपही राजू शेट्टी यांनी केला.

यंदाच्या लोकसभेची लढाई ही सर्वसामान्यांची लढाई आहे, ही कोणा एकाची लढाई नाही. शेती, कामगार, शेतमजूर, व्यापारी, उद्योजक यांचे अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत. शेतकऱ्यांची अवस्था विदारक झालेली आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि संसदेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आपल्याला ही लढाई जिंकायची आहे, असा विश्वास राजू शेट्टी यांनी बोलून दाखवला.

Edited By : Vijay Dudhale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT