Kolhapur News : इचलकरंजी शहराला पाणी पुरवठ्यासाठी राज्य सरकारने सुळकुड योजना मंजूर केली आहे. मात्र, या योजनेमुळे कागल तालुक्यातील जनतेला पाणी कमी पडण्याची भीती आहे. त्यामुळे इचलकरंजी आणि कागल तालुका असा संघर्ष सुरू झाला आहे. शिवाय महायुतीतील नेतेच या प्रकल्पावरून एकमेकांवर बरसले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने इचलकरंजीचा पाणी प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे.
विद्यमान खासदार, आमदार आणि जो इच्छुक उमेदवार या योजनेसाठी सर्वस्व पणाला लागून इचलकरंजीला पाणी मिळवून देईल, त्याच्या मागे आगामी निवडणुकीतील इचलकरंजीतील जनता राहील, असा कौल आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने हा प्रश्न मार्गी काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांची ही धडपड सुरू आहे.
विद्यमान खासदार धैर्यशील माने (Dhairyashil Mane), आमदार प्रकाश आवाडे यांनी ही योजना पूर्ण करण्यासाठी राजकीय स्तरावर विविध प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुळकुड योजनेद्वारे तिसरा पर्याय म्हणून कोणती उपाययोजना करता येईल. यासाठी शुक्रवारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह कोल्हापूरचे पालकमंत्री जिल्हाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता .१) दुपारी २ ला विधानभवनातील समिती सभागृहात बैठक आहे. त्यात इचलकरंजी शहराला पाणी देण्यासाठी तिसऱ्या पर्याय पुढे येण्याची शक्यता आहे. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, प्रकाश आवाडे, सतेज पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, राजू शेट्टी, सुरेश हाळवणकर, संजयबाबा घाटगे, उल्हास पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह शिष्टमंडळ, अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushriff) यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, इचलकरंजी शहराला शुद्ध पाण्याची अत्यंत गरज आहे. यापूर्वी पंचगंगा, कृष्णा नदीतून योजनाही करण्यात आल्या आहेत; मात्र कृष्णा नदी पाणी योजनेतून भौगोलिक परिस्थितीमुळे अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे दूधगंगा नदीवरून सुळकूड पाणी योजना मंजूर केली आहे. मात्र यावर्षी कमी पाऊस झाल्याने सहा टीएमसी पाणी कमी झाले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यामुळे लोकांना पिण्यासह शेतीच्या पाण्यासाठी टंचाई जाणवत आहे. परिणामी इचलकरंजी शहरासाठी तिसरा पर्याय द्यावा लागणार आहे. इचलकरंजी शहराला शुद्ध पाणी देतानाच इतर गावांना टंचाईचा सामना करावा लागू नये, यावर विचार मंथन सुरू आहे. शुक्रवारच्या बैठकीत आणखी एका पर्यायावर विचार केला जाईल; मात्र कोणावरही अन्याय होऊ न देता इचलकरंजी शहराला पाणी देण्यात येईल, असेही मुश्रीफ यांनी पत्रात नमूद केले आहे.
Edited By : Umesh Bambare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.