Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महाआघाडीचा उमेदवार पडणार; हसन मुश्रीफांचे भाकीत

Vijaykumar Dudhale

Kolhapur, 06 July : विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व नऊही उमेदवार निवडून येतील. महायुतीचे सगळे उमेदवार निवडून येणार म्हणजे महाविकास आघाडीचा पराभव होणार, असे भाकित हसन मुश्रीफ यांनी वर्तविले आहे. त्यामुळे पराभूत होणारा उमेदवार कोण असणार, याची चर्चा रंगली आहे.

कोल्हापूर (Kolhapur) नियोजन समितीची बैठक पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushirf) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना मुश्रीफ यांनी विधान परिषद निवडणुकीबाबत (Vidhan Parishad) भाष्य केले. आता पराभूत उमेदवार कोणाचा असणार, कोण कोणाचा पत्ता कट करणार, याची चर्चा आता रंगू लागली आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पाठिंबा द्यावा, असे पवारांचे म्हणणे होते. मात्र, उद्धव ठाकरेंनी पवारसाहेबांचं ऐकलेलं दिसत नाही, अशा शब्दांत मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीतील वर्मावर बोट ठेवले आहे.

विनय कोरे यांनी महायुतीत विधानसभेच्या पंधरा जागा मागितल्या आहेत. त्यावर हसन मुश्रीफ म्हणाले, विनय कोरे यांच्या मागणीवर महायुतीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. मेरिट आणि निवडून येण्याची क्षमता महत्त्वाची आहे, त्यांनी ते दाखवून दिले आणि नेते मंडळींना पटलं, तर जागा देण्यात येईल.

काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करण्यात येत आहे, त्यावरही मुश्रीफ यांनी भाष्य केले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक पक्ष स्वबळावर लढण्याचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे जोपर्यंत निवडणूक लागत नाही, तोपर्यंत चित्र स्पष्ट होणार नाही, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

रवींद्र वायकर यांनी काही केले नसेल तर त्यांना क्लीन चिट मिळणारच. ज्यांना त्याबाबत शंका आहे, त्यांनी उच्च न्यायालयात न्याय मागावा, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला. तसेच विशाळगड अतिक्रमणाबाबत ते म्हणाले, विशाळगडाची जागा ही पुरातत्त्व विभागाच्या नावावर आहे आणि न्यायालयाची त्याला स्थगिती आहे. ही स्थगिती उठवून लवकरात लवकर सुनावणी घ्यावी, असे आवाहन पुरातत्व विभागाने केलेले आहे.

डीपीडीसी बैठकीबाबत ते म्हणाले, ऑक्टोंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. नियमाप्रमाणे तीन-चार महिन्यांनी एक जिल्हा नियोजन विभागाची बैठक घ्यावी, असे आदेश आहेत, त्याप्रमाणे आज सभा घेत आहे... कोल्हापूर जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे मोठ्या निधीची गरज आहे. मात्र, उपलब्ध निधीमध्ये चांगले काम मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न असेल. कोल्हापूर जिल्ह्यातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले आहे. येत्या आठ दिवसांत खड्डे कुठे आहेत, आपण दाखवावं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT