Amol Mitkari
Amol Mitkari sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

भाजप आणि ५० खोकेवाल्यांचे हिंदुत्वप्रेम बेगडी... अमोल मिटकरी

​आयाज मुल्ला

वडुज : भाजप व त्याचे समर्थन करणाऱ्या अनेकांना हनुमान चालिसा, रामरक्षा तरी येते का, ते त्यांच्या पक्ष नेतृत्वाने तपासावे. भाजप आणि 50 खोकेवाल्यांचे हिंदुत्वप्रेम हे बेगडी आहे, अशी टीका आमदार अमोल मिटकरी यांनी केली.

सातेवाडी (ता.खटाव) येथील मधुमाला मंगल कार्यालयात खटाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानांतर्गत कार्यकर्ता मेळाव्यात आमदार मिटकरी बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, प्रदिप विधाते आदी उपस्थिती होते.

अमोल मिटकरी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आचार, विचारांवर कार्यरत असणारा पक्ष आहे. राज्यातील सर्वसामान्य जनता व शेतकरी, कष्टकऱ्यांच्या हिताचे कायम निर्णय घेण्यात आले. कोरोना काळात आरोग्य, अर्थ खाते यशस्वीरित्या सांभाळल्याने त्याची दखल देशातील कॅग संस्थेने घेतली. राज्यात सर्वाधिक आत्महत्या हिंदू धर्मातील लोक करीत आहेत.

त्याकडे या हिंदुत्ववादी लोकांचे दुर्लक्ष आहे. सत्तेत आलेल्या सरकारमध्ये कोणालाच कोणाला मेळ नसल्याचा कारभार सुरू आहे. कोणते खाते कोणाकडे आहे, हे जनतेलाही समजले नाही. राज्यात सद्या थैमान घातलेल्या लम्पी रोगातून पशुधन वाचविण्यासाठी लसींचा योग्य प्रमाणात पुरवठा केला जात नाही. याउलट गुजरातमध्ये लस पाठविली जाते, त्यातून काळाबाजार केला जात आहे.

खासदार पाटील म्हणाले, राज्यातील सर्वसामान्य घटकांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना नेतृत्व करण्याची संधी राष्ट्रवादीमुळे मिळाली. तालुक्यावर राष्ट्रवादीचे असणारे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आगामी काळात कार्यकर्त्यांनी दक्ष रहावे. तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे म्हणाले, खटाव तालुक्यावर राष्ट्रवादीच्या विचारांचा कायम प्रभाव राहिला आहे.

त्यामुळे आगामी काळात तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीचे एकहाती वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करू. तालुक्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची ताकद एकसंघ आहे. यावेळी सुरेंद्र गुदगे, बाळासाहेब सोळसकर, जितेंद्र पवार, प्रा. बंडा गोडसे, संदिप मांडवे, श्रीमती शशिकला देशमुख,कविता म्हेत्रे, ॲड. विलास इंगळे, हिंदुराव गोडसे, यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

मशाल पेटविण्याचे काम राष्ट्रवादी करेल...

शशिकांत शिंदे म्हणाले, खटाव तालुक्यातील एक सेनापती गेला असला तरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजूनही एकसंघ आहेत. 50 खोक्यांमध्ये आमच्याही भागातील एक जण सहभागी आहे. खटाव तालुक्यात इतिहास घडविण्याची ताकत आहे. तालुक्यातील राष्ट्रवादीची ताकद कायम ठेवावी. शिवसेनेला मशाल चिन्ह मिळाले आहे. केंद्र व राज्यातील हुकूमशाही प्रवृत्तींना कायमचे घरी बसविण्यासाठी उद्याच्या क्रांतीची ही मशाल पेटविण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT