Bhagirath Bhalke Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bhagirath Bhalke : महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर पहिला हक्क माझा; भगीरथ भालकेंनी का केला हा दावा?

हुकूम मुलाणी

Mangalvedha, 17 September : पंढरपूर-मंगळेवढा मतदारसंघातून महाविकास आघाडीची उमेदवारी मिळावी, यासाठी मोठी स्पर्धा दिसून येत आहे. विशेषतः तुतारीची उमेदवारी मिळावी, यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. यामध्ये लोकसभा निवडणुकीला भाजप महायुतीसोबत असणाऱ्यांचाही समावेश आहे.

तोच मुद्दा पकडत भगीरथ भालके यांनी सध्याचे इच्छूक लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीबरोबर नव्हते. आम्ही महाविकास आघाडीचे काम केले आहे, त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर पहिला हक्क माझा आहे, असा दावा भालके यांनी केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी मतदारसंघात जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले आहे. भालके यांची ही यात्रा सध्या मंगळवेढा तालुक्यात आहे. मंगळेवढा तालुक्यातील भाळवणी येथे यात्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सभेत भालके यांनी उमेदवारीबाबतचा दावा केला आहे.

भालके म्हणाले, लोकसभा निवडणुकीत माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघात आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काम केले आहे. सध्याचे इच्छुक महाविकास आघाडीसोबत नव्हते, त्यामुळे महाविकास आघाडीच्या विधानसभा उमेदवारीवर पहिला हक्क माझा आहे. पंढरपूर-मंगळेवढा मतदारसंघातील (Pandharpur-Mangalevdha Constituency ) प्रस्थापितांच्या विरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीची साथ हवी आहे, अशी भूमिका मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसमोर मांडली आहे.

तब्बल 11 वर्षे आमदार राहिलेल्या (स्व.) भारत भालके यांनी कोणत्याही गावात द्वेषाचे राजकारण केले नाही. विरोधातील ग्रामपंचायत आहे अथवा विरोधातील माणूस आहे; म्हणून त्याचे काम टाळले नाही. उलट सर्वसामान्य जनता म्हणून त्यांची कामे केली. मात्र सध्याच्या लोकप्रतिनिधीकडून विरोधातील ग्रामपंचायत आहे; म्हणून निधी द्यायचा नाही, शासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना गटात यावे, यासाठी त्रास दिला जात आहे, असा आरोपही भगीरथ यांनी आमदार समाधान आवताडेंवर केला.

पोटनिवडणुकीत माझा 3600 मतांनी पराभव झाला. तो पराभव मान्य करून मी जनतेसोबत काम करीत आहे. महायुती सरकारने मंजूर केलेल्या मंगळवेढा सिंचन योजनेत बॅरेज वगळून 24 गावांतील शेतीला शेततळ्यातून पाणी देण्याची योजना यशस्वी होईल का सवाल भालकेंनी केला.

भगीरथ भालके म्हणाले, पंढरपूर-मंगळेवढा मतदारसंघात 3000 कोटींचा निधी आणल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात झालेली कामे ही तुमच्यासमोर आहेत. ठेकेदारही तेच आणि अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारेही तेच आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांनी न्याय कुणाकडे मागायचा, असा प्रश्न आहे.

दुष्काळी सवलतीपासून मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना वंचित ठेवले आहे, त्याच पद्धतीने मराठा, धनगर आरक्षणावरून दोन्ही समाजाला सरकारने झुलवत ठेवले आहे. मंगळेवढा तालुक्यात माझा 13 दिवस मुक्काम असून तीन दिवसांत अनेक तक्रारी माझ्यासमोर आल्या आहेत, असा दावाही त्यांनी केला.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT