Nitin Patil, Vasantrao Mankumre, Makarand Patil
Nitin Patil, Vasantrao Mankumre, Makarand Patil wai reporter
पश्चिम महाराष्ट्र

'किसन वीर'च्या रणांगणात 'राष्ट्रवादी'ची उडी; समविचारींशी आघाडी करणार...

भद्रेश भाटे - Bhadresh Bhate

वाई : ''भुईंज किसनवीर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली समविचारी व्यक्ती व पक्षांची आघाडी करून लढविण्याचा निर्णय येथील शेतकरी सभासदांच्या मेळाव्यात घेण्यात आला. पाच तालुक्याची मातृसंस्था असलेला हा कारखाना वाचविण्यासाठी मार्ग काढावा लागेल. त्यासाठी निवडणूक लढवावीच लागेल. तुम्ही साथ दिली तर शंभर टक्के विजयी होऊ आणि गतवैभव प्रात्प करून देऊ,'' असा विश्वास आमदार मकरंद पाटील यांनी व्यक्त केला.

किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर येथील धनश्री मंगल कार्यालयात कार्यक्षेत्रातील पाच तालुक्यातील शेतकरी सभासदांचा विचार मेळावा पार पडला. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, माजी आमदार सदाशिव सपकाळ, वसंतराव मानकुंबरे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रतापराव पवार, बकाजीराव पाटील, बाळासाहेब सोळसकर, उदय कबुले, नितीन भरगुडे पाटील, शामराव गाढवे, शशिकांत पिसाळ, दिलीप पिसाळ, महिला आघाडीच्या अध्यक्षा मनीषा गाढवे, चंद्रकांत ढमाळ, मनोज पवार, एस.वाय. पवार, डॉ.नितीन सावंत, तानाजी शिर्के, अमित कदम, रामभाऊ लेंभे, वामनराव जमदाडे उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, किसन वीर आबांनी दूरदृष्टी ठेवून स्थापन केलेला हा कारखाना उभारताना अनेक अडचणी आल्या होत्या. त्यावर मात करून १२५० मेट्रिक टनाचा कारखाना सुरु केला. धोम धरणामुळे ऊसाचे क्षेत्र वाढले त्यामुळे तात्यांच्या काळात चार हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेपर्यंत विस्तार करण्यात आला. अवघ्या साडेसहा कोटींचे रेग्युलर कर्ज व सात लाख ३० हजार साखरेची पोती शिल्लक असलेला कारखाना शेवटचा ५० रुपयांचा हप्ता देता न आल्याने तुम्ही कारखाना विरोधकांच्या ताब्यात दिला.

शेतकरी संघटना आंदोलने करत होती. त्यावेळी तात्यांनी एकाकी लढत दिली परंतू अपयश आले. मात्र आज ९५० कोटींचा कर्जांचा बोजा, मागील हंगामातील ऊसांचे बिले मिळाली नाहीत. कामगारांचे २२ महिन्याचे पगार दिले नाहीत. बँकांनी जप्ती आणली आहे. कुठलीही बँक आज कारखान्यास कर्जे देऊ शकत नाही. अशी भयानक परिस्थिती असताना शेतकरी संघटना व सभासद शांत आहेत. कोणीही आंदोलन केले नाही. आम्ही जीव तोडून सांगत होतो. त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन मदतीची मागणी केली होती.

विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खोडसाळपणे प्रश्न विचारण्यास भाग पाडले. राज्य सरकार मदत करीत नाही असा कांगावा विरोधक करीत आहेत. मागील हंगामातच कारखाना बंद पडला असता परंतू आघाडी सरकारने ३३ कोटी थकहमी दिल्याने कारखाना उशीरा सुरु झाला. त्यावेळी आम्ही मनात आनले असते तर एक छदामही कारखान्याला मिळू दिला नसता. थकहमीचे २२ कोटी शासनास परत न केल्याने कारखाना बंद पडला आहे.

सातारा जिल्हाच्या राजकारणाचे वैभव म्हणून ओळख जाणारा व किसनवीर आबांचे नाव असलेला हा कारखाना काही झालेतरी वाचला पाहिजे. तुम्ही साध दिली तर शंभर टक्के निवडणूक लढवून यशस्वी होऊ. अवधी कमी असल्याने महत्वाच्या कार्यकर्त्यांनी अर्ज भरून ठेवावेत. जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा करून अंतिम निवड करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

नितीन पाटील यांनी कारखान्याच्या आर्थिक स्थितीचा सखोल आढावा घेऊन कारखान्याची निवडणूक लढणे व जिंकणे सोपे आहे. परंतू तो चालविणे कठीण आहे. विद्यमान संचालक मंडळाच्या आर्थिक घोटाळ्यामुळे व चुकीच्या व्यवस्थापनामुळे कारखाना १३५ कोटीं तोटयात असून त्यातच प्रतापगड कारखाना चालविण्यास घेतला. आणि खंडाळा कारखान्याची उभारणी केली त्यामुळे हजार कोटींचा कर्जांचा बोजा झाला आहे. दरवर्षी ५५ कोटी रुपये व्याजाचा बोजा वाढत आहे. मालमत्ता केवळ ७५० कोटींची आहे. त्यावर बँकेने जप्तीच्या नोटीसा बजाविल्या आहेत.

यापूर्वी हीच परिस्थिती होती त्यामुळे निवडणूक लढविली नाही. कारखाना कसा सुरु करायचा हाच खरा प्रश्न आहे. नवीन कारखाना उभारायचा म्हटले तर नियमानुसार २५ किमी क्षेत्राच्या अटीमुळे ते शक्य नाही. हा कारखाना वाचविण्यासाठी शंभर ते दिडशे कोटी भागभांडवल उभे करावे लागेल. त्यासाठी सभासदांनी योगदान दिले तरच कारखाना सुरु होऊ शकतो असे स्पष्ट केले. यावेळी सदाशिव सपकाळ, नितीन भरगुडे पाटील, वसंतराव मानकुंबरे, प्रताप पवार, बाळासाहेब सोळसकर, शशिकांत पिसाळ य़ांनी मनोगत व्यक्त केले.

अजय भोसले, अँड.सचिन गायकवाड, बाजीराव महांगडे, अशोकराव पवार, अजय वांगडे, अतुल जाधव, राजेंद्र गाढवे यांनी कारखाना वाचविण्यासाठी निवडणूक लढवावी अशी सुचना करून सर्व शेतकरी सभासद व कार्यकर्ते खंबीरपणे पाठीशी उभे राहून. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रास्ताविक केले. महेंद्र पुजारी यांनी आभार मानले. यावेळी वाई, खंडाळा. जावळी, कोरेगाव, सातारा या पाच तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते व शेतकरी सभासद उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT