Uday Samant  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Uday Samant : 'टक्केवारीचा हिशेब जुळला नाही म्हणून कामं अर्धवट ठेवली, या अर्धवटरावांना पालिकेपासून दूर ठेवा'

Akkalkot Nagar Parishad Election 2025 : उदय सामंत यांनी अक्कलकोट नगरपालिकेतील भाजपच्या मागील सत्तेवर टक्केवारीतील गोंधळ आणि अपूर्ण कामांबाबत गंभीर आरोप केले. मतदारांनी अशी प्रशासनं दूर ठेवलं पाहिजे, असे ते म्हणाले.

विश्वभूषण लिमये
  1. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अक्कलकोट नगरपालिकेतील मागील भाजप सत्तेवर टक्केवारीचे गंभीर आरोप करत अर्धवट कामांसाठी त्यांना जबाबदार धरले.

  2. शिवसेनेचे उमेदवार रईस टिनवाला यांना विकासकामे, विशेषतः 400 कोटींच्या निधीच्या वापरासाठी आणि आगामी एमआयडीसी प्रकल्पासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले.

  3. सभेत सर्वधर्मीय प्रतिनिधित्व, पारदर्शक कारभार आणि पुढील पाच वर्षांत रोजगारनिर्मितीची हमी देत सामंत यांनी भावनिक आणि आक्रमक भाषण केले.

Solapur, 28 November : मागील पंचवार्षिकमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या अक्कलकोट नगरपालिकेवर महायुतीमधील शिवसेनेचे मंत्री उदय सामंत गंभीर आरोप केले आहेत. अक्कलकोटमध्ये टक्केवारीचा हिशेब व्यवस्थित झाला नाही; म्हणून कामं अर्धवट राहिली आहेत. समोरच्यांचे डिपॉजिट जप्त करा आणि या अर्धवट लोकांना नगरपालिकेपासून दूर ठेवा, असे आवाहन उद्योगमंत्री सामंत यांनी केले आहे.

अक्कलकोट (Akkalkot) नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार रईस टिनवाला यांच्या प्रचारासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांची सभा झाली. त्या सभेत बोलताना मागील पंचवार्षिक निवडणुकीत सत्ता असलेल्या भाजपवर टक्केवारीचे आरोप केले.

माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे (Siddharam Mhetre) यांची 1 तारखेची सभा ही विजयी सभा होणार आहे. आमच्या सभेला बसायला जागा नाही; म्हणून नव्या खुर्च्या लावाव्या लागत आहेत. पण, दुसऱ्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या असतात. आता नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाची खुर्ची आपणाला मिळालेली आहे. अक्कलकोटला 400 कोटी रुपये जे मिळाले आहेत, ते खर्च करण्यासाठी रईस टिनवाला यांना निवडून द्यायचं आहे; कारण ते एकनाथ शिंदे यांनी मंजूर केले आहेत, असा दावाही सामंत यांनी केला.

उदय सामंत (Uday Samant) म्हणाले, टक्केवारीचा हिशेब व्यवस्थित झाला नाही; म्हणूनच अक्कलकोटमधील कामं अर्धवट राहिली आहेत, त्यामुळे अर्धवट लोकांना नगरपालिकेपासून दूर ठेवलं पाहिजे. नगराध्यक्ष झाल्यानंतर विजयी निकाल लागेल, त्यानंतर पुढील 8 दिवसांत अक्कलकोटला माझ्या सर्व अधिकाऱ्यांना घेऊन येईन, पुढील 5 वर्षांत किमान 500 मुलं-मुली स्वतःच्या पायावर उभ राहतील, ही जबाबदारी माझी आहे. स्वामी समर्थ्यांच्या आशीर्वादाने राज्याचा उद्योग मंत्री म्हणून हा माझा शब्द आहे.

आज रईस टिनवाला यांना इथे उमेदवारी दिली आहे, त्यामुळे सर्वधर्म आणि जातींना संधी देण्याचं काम आम्ही केले आहे. समाज, धर्म, जात आणि पंथ यापलीकडे विकास असतो. लोकसभा आणि विधानसभेला आमच्याबद्दल मुस्लिम बांधवांमध्ये गैरसमज करून दिला होता, आता तो दूर झाला असेल कारण आता आमचे उमेदवार रईसभाई आहेत, असेही उद्योगमंत्र्यांनी स्पष्ट केले.

उदय सामंत म्हणाले, सगळ्याच गोष्टी दादागिरीने होत नाहीत, रईसभाई नगराध्यक्ष झाल्यानंतर सर्व जाती धर्माची कामे ते पूर्ण करतील. दादागिरी करायची असेल तर ती मंत्र्यांवर केली पाहिजे आणि ती दादागिरी करून स्वतःच्या भागाचा विकास करून घ्यावा. अशी दादागिरी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केली आहे. अक्कलकोट भागात एमआयडीसी व्हावी, अशी इच्छा म्हेत्रे यांनी बोलून दाखवली. पुढील 6 महिन्यांत एमआयडीसीचं नोटिफिकेशन माझ्या विभागामार्फत काढलं जाईल

विकासकाम करण्यात कर्तृत्व आहे, ती थांबावण्यात काही कर्तृत्व नसतं, ते काय लहान मुलंही करू शकतात. माझ्या 4 नंबर प्रभागातील सहकार्याच्या घरात दुर्दैवी घटना घडलेली असताना मी सत्कार करून घेतला नाही, हे आमचे संस्कार आहेत. आज आपला धनुष्यबाणचा शो हाऊसफुल आहे. सिद्धाराम म्हेत्रे राज्यमंत्री असताना त्यांचं काम मी पाहिलेलं आहे. त्यावेळेस त्यांचं पहिले प्राधान्य हे अक्कलकोट आणि दुधनीला असायचं, असेही सामंत यांनी सांगितलं.

भाषण सुरु असताना उद्योग मंत्री उदय सामंत यांना अचानक फोन आला (हा फोन नेमका कोणाचा होता, याबाबत सभेत खसखस पिकली होती). ते म्हणाले, रईसभाई आपण जनतेला एक शब्द द्या की पारदर्शक काम करू. आपल्यामध्ये नम्रता असली पाहिजे अक्कलकोटमध्ये एमआयडीसी नक्की करणार आहे आणि एकनाथ शिंदे हे तुम्हाला निधीही देणार आहेत. पुढच्या विजयी मिरवाणुकीला बोलावणार आहात ना, बोलावलात तर ठीक नाय तर निर्लज्जसारखं मी येऊन उभा राहीन.

  1. प्र. सामंत यांनी भाजपवर कोणता आरोप केला?
    उ: टक्केवारीचा हिशेब बरोबर न झाल्याने कामे अर्धवट ठेवली, असा आरोप त्यांनी केला.

  2. प्र. रईस टिनवाला यांना का निवडून द्यावे, असे सामंत म्हणाले?
    उ: मंजूर 400 कोटींचा निधी योग्यरित्या खर्च करण्यासाठी आणि विकासासाठी.

  3. प्र. एमआयडीसीबाबत काय घोषणा झाली?
    उ: पुढील सहा महिन्यांत एमआयडीसीचे नोटिफिकेशन काढण्याचे आश्वासन देण्यात आले.

  4. प्र. सभेचा मुख्य संदेश काय होता?
    उ: पारदर्शक, सर्वधर्मीय आणि विकासाभिमुख नेतृत्वाची गरज असल्याचा संदेश.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT