Prashant Paricharak-Abhijeet Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prashant Paricharak : तब्बल नऊ वर्षांनी झालेल्या पंढरपूरच्या आमसभेत माजी आमदार प्रशांत परिचारक 'टार्गेट'वर

Pandharpur Aamsabha : पंढरपूर शहरातील उद्याने आणि 11 रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची सुरू आहेत, त्या कामांची चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागी माजी नगरसेवक किरण घाडगे यांनी केली.

भारत नागणे

Pandharpur, 27 February : तब्बल नऊ वर्षांनंतर आज (ता. 27 फेब्रुवारी) माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूरची आमसभा पार पडली. या आमसभेला चार आमदार उपस्थित होते. ही आमसभा आमदार राजू खरे आणि समाधान आवताडे यांच्याती खडाजंगीमुळे जशी गाजली, तशीच ती माजी आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार पाटील यांच्यातील कार्यकर्ते आमने सामने आल्याने गाजली. शेवटी आमदारांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन्हीकडे कार्यकर्ते शांत झाले.

पंढरपूर पंचायत समितीच्या प्रांगणात ही आमसभा पार पडली. या आमसभेला पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील (Abhijeet Patil), सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, मोहोळचे आमदार राजू खरे उपस्थित होते. या आमसभेत अवैध वाळूउपशासह शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज या प्रश्नावरून नागरिकांनी आमदार आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

आमसभेला सकाळी अकराच्या सुमारास सुरुवात झाली. या सभेत पंढरपूर शहरातील उद्याने आणि 11 रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची सुरू आहेत, त्या कामांची चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागी माजी नगरसेवक किरण घाडगे यांनी केली. त्याचवेळी माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांनी स्वतःच्या घराकडे जाण्यासाठी रस्ते तयार करुन घेतले आहेत, असाही आरोप त्यांनी केला.

माजी नगरसेवक किरण घाडगे यांच्या आरोपावर परिचारक गटाने आक्षेप घेतला. माऊली हळणवर, बंटी वाघ यांच्यासह काही माजी नगरसेवकांनी घाडगे यांनी गोंधळ घातला. घाडगे यांनी केलेल्या आरोपावरून माजी आमदार परिचारक आणि आमदार अभिजीत पाटील यांचे कार्यकर्ते आमने सामने ठाकले होते. त्यामुळे सभेत एकच गोंधळ उडाला. शेवटी व्यासपीठावरील आमदारांनी हस्तक्षेप केल्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते शांत झाले, त्यानंतर आमसभेचे कामकाज सुरळीत झाले.

करकंब, पोहे, नांदोरे येथील शेतकऱ्यांनी उजनी उजवा कालव्यातून फाटा क्रमांक 33 ला पाणी मिळत नसल्याची तक्रार केली. याच मुद्यावर आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना पाणी देण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना केली. जळलेले डीपी महावितरणकडून वेळेत दुरुस्त करुन दिले जात नाहीत, अशी तक्रार शेतकरी संघटनेचे समाधान फाटे, सचिन पाटील, नितीन बागल यांनी केली. त्यावर आमदार समाधान आवताडे यांनी शेतकऱ्यांना आठ दिवसांत डीपी दुरुस्त करुन द्या; अन्यथा कारवाई करू, असा इशारा महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT