Congress Leader Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mangalvedha Issue : सत्ताधारी भाजपवरील नाराजीचा फायदा उचलण्याची संधी काँग्रेसने गमावली

हुकूम मुलाणी

Mangalveda News : दुष्काळी यादीत मंगळवेढा तालुक्याला डावलणे, तसेच प्रलंबित प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे जनतेबरोबरच सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्या नाराजीचा फायदा घेण्याची संधी असतानाही काँग्रेस नेत्यांनी त्याकडे सोयीस्करपणे कानाडोळा केला आहे. काँग्रेस नेत्यांच्या दुर्लक्षामुळे मंगळवेढ्याच्या प्रश्नाला न्याय कोण देणार?, असा सवाल उपस्थित होत आहे. (Ruling BJP's neglect of Mangalvedha issue)

तालुक्यातील मंगळवेढा उपसा सिंचन योजना, महात्मा बसवेश्वर, संत चोखोबा स्मारक, सध्याच्या दुष्काळाच्या यादीतून मंगळवेढ्याला डावलणे या घटनांमुळे शेतकऱ्यांसह सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नुकताच पंढरपूर दौरा झाला, त्या दौऱ्यात मंगळवेढा तालुक्याच्या दृष्टीने एखादी घोषणा होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, तसा कुठचाही प्रकार न झाल्याने सत्ताधाऱ्यांवरील नाराजीत आणखी भर पडली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तालुक्यातील प्रलंबित प्रश्नावर रान उठवण्याची संधी काँग्रेस पक्षाला असताना पक्षाचे जिल्ह्यातील नेते, तसेच लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांनीही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. किमान त्यांनी या प्रश्नावर मतदारसंघात येऊन आवाज उठवला असता तरी लोकांची सहानुभूती मिळवण्याची संधी काँग्रेसला होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले गेले.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांच्या निवडीवरच सुरुवातीच्या काळात काहींनी आक्षेप घेतला होता. मात्र, त्यांनी अध्यक्षपदाचा पदभार घेतल्यानंतर शहरामध्ये स्वतंत्र कार्यालय उघडून पदाधिकाऱ्यांच्या निवडी करत काँग्रेसची संघटना जुळवणी सुरू केली होती. त्याचबरोबर म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन दिले. जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्याबरोबर जाऊन स्वाभिमानीच्या आंदोलनला दिलेला पाठिंबा, नवरात्रीत राबवलेला आपुलकीची भेट हा उपक्रमांद्वारे ते मतदारांच्या संपर्कात आहेत. मात्र त्यांना बळ देण्याच्या दृष्टीने जिल्हा नेतृत्वाने लक्ष देण्याची गरज आहे.

लोकसभेच्या 2014 व 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला. स्थानिक आमदार विरोधी पक्षाचे असतानाही मंगळवेढ्यातून काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना दोन्ही वेळेला मताधिक्य मिळाले. परंतु ते या मतदारसंघातील प्रश्नावर फिरकले नाहीत, त्यामुळे फक्त निवडणुकीपुरते येऊन लोकांची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून दोन निवडणुकीत झालेला आहे, त्यामुळे भविष्यात इथल्या मतदारांकडून सावध पवित्रा घेतला जाऊ शकतो.

सोलापूर येथे आज लोकसभा मतदारसंघातील तालुकाध्यक्षांची बैठक झाली. त्यात तालुकानिहाय प्रश्न जाणून घेण्यात आले. तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनीही तेच प्रश्न नेत्याच्या कानावर घातले. त्यामुळे मंगळवेढ्याच्या प्रश्नावर काँग्रेसला आवाज उठवण्याची संधी आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होण्याला सव्वा दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना या काळात काँग्रेस नेते या प्रश्नाकडे कशा पद्धतीने लक्ष देतात, यावर काँग्रेसचे भवितव्य अवलंबून आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT