Rajesh Kshirsagar and Ravikiran Ingawale  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivsena Thackeray Group : ठाकरे गटाच्या नेत्यांचा गल्लीत गोंधळ; राजकीय संस्कृती बिघडवण्याचा प्रयत्न

Shivsena Kolhapur : शिवसेनेच्या फुटीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील समीकरणे बदलत गेली. विद्यमान आमदारांसह माजी आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या वळचणीला गेले आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur News: शिवसेनेच्या फुटीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील समीकरणे बदलत गेली. विद्यमान आमदारांसह माजी आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या वळचणीला गेले. अशातच शिंदे गटात गेलेल्या नेत्यांना ठाकरे गटाकडून समाचार घेण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार आणि सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्याकडून संयमी राजकारण होत असताना ठाकरे गटाच्या एका एका नेत्याला कोल्हापूरच्या राजकीय संस्कृतीचा विसर पडला की काय ? अशी चर्चा आता कोल्हापुरात उमटत आहे.

शिवसेना उपनेते संजय पवार आणि सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या ध्येयधोरणावर सडकून टीका केली. मात्र, शहराध्यक्ष रविकिरण इंगवले यांच्याकडून मुंबई, दिल्लीपेक्षा गल्लीतील नेत्यांच्या विरोधात आक्रोश जास्त दिसत आहे.

शिवसेना फुटीपूर्वी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि रविकिरण इंगवले यांनी एकत्रच काम केले आहे. मात्र, इंगवले यांच्याकडून प्रत्येक शिवसेनेच्या ठाकरे किंवा शिंदे गटाच्या दौऱ्यात राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना टार्गेट केले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोन महिन्यांपूर्वी राज नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या राजेंद्र वरपे या कुटुंबीयांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला होता. मात्र, या घरगुती वादात ठाकरे गटाने उडी घेतली. माजी आमदार क्षीरसागर यांना टार्गेट केले. शिवाय वरपे कुटुंबाच्या मुलांचा इंगवले यांनी सत्कार करून क्षीरसागर यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. वरपे कुटुंबीयांना न्याय मिळवण्यासाठी ठाकरे गटाची भूमिका योग्य होती. त्यासाठी त्यांनी जिल्हा पोलिस प्रमुख यांचीही भेट घेऊन क्षीरसागर यांच्यावर कारवाईची मागणी केली.

पण ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे कोल्हापुरात आल्यानंतर वरपे कुटुंबाला न्याय देण्यासाठी जनता दरबारात दाद मागितली. मात्र, इथेही ठाकरे गटाच्या नेत्याने पुन्हा वरपे यांना दानवे यांच्यासमोर नेऊन स्टंटबाजी करण्यास भाग पाडल्याचे सांगितले जाते. इतकंच नव्हे तर माजी आमदार क्षीरसागर यांच्या घरी दानवे यांना कोणतरी फूस लावल्याचे सांगितले जाते. त्याचा परिणाम म्हणून कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांना जवळपास 400 पोलिसांचा बंदोबस्त लावावा लागला.

तीन दिवसांपूर्वी शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापुरात पार पडले. त्यांची जाहीर सभा गांधी मैदान येथे पार पडली. मात्र, सभा मार्गावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पोस्टर लावून शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला. वास्तविक पाहता अंबादास दानवे यांचा दौरा सुरळीत पडला असता. शिंदे गटाचे महाअधिवेशनही विना चर्चा पार पडले असते. त्याला तितके महत्त्व देणे गरजेचे नव्हते.

ठाकरे गटाचे नेते यांनी या अधिवेशनावर भाष्य केले नाही. केवळ कटआउटच्या उंचीवर शिंदे गटावर निशाणा साधला. मात्र, ठाकरे गटाच्या नेत्यांनी केवळ दानवे यांच्या दौऱ्याला अधिक महत्त्व न देता क्षीरसागर यांचे खच्चीकरण करण्यास भर दिला. शिवाय मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे पोस्टर लावून कळ काढण्याचा प्रयत्न केला. स्वतःला चर्चेत ठेवण्यासाठी खोड्या काढण्याचे काम ठाकरे गटाचे नेते करत असल्याचे चित्र यावरून दिसून येते.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT