Chandrakant Jadhav Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Loksabha : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाकडून महायुतीत ठिणगी ? चंद्रकांत जाधव यांनी घेतली आक्रमक भूमिका...

Umesh Bambare-Patil

Satara Loksabha : छत्रपती शिवाजीमहाराजांची राजधानी असलेल्या सातारा येथील गांधी मैदानावर मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला महायुती पदाधिकार्‍यांचा मेळावा झाला. या मेळाव्याला 24 तास होत नाही तोच महायुतीमध्ये ठिणगी पडली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

यापूर्वी पराभूत झालेल्या व जनतेने नाकारलेल्या उमेदवारांना तिकीट देऊ नये, सर्वसामान्य शिवसैनिकाला सातारा लोकसभेला उमेदवारी द्यावी, अशी भूमिका घेतली आहे. याबाबत बोलताना चंद्रकांत जाधव म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी व हिंदूत्वासाठी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने भूमिका मांडली.

ग्रामीण भागातून आलेल्या कष्टकरी, कामगार व त्यांच्या मुलांचे चांगल्या पद्धतीने वैचारिक संगोपन केले. त्यामुळे खर्‍या अर्थाने महाराष्ट्रावर शिवसेनेचा भगवा फडकला. यामध्ये कुणीही प्रस्थापित घराण्यातली व्यक्ती नव्हती. त्यामुळेच आज शिवसेनेची सत्ता आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देश व महाराष्ट्रात विकासाची घोडदौड सुरू झालेली आहे.

महिलावर्गाला एसटीमध्ये अर्धे तिकीट, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, वेळेत कर्जपुरवठा व कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांसाठी अनुदान, तसेच सर्व जाती-धर्मातील घटकांना न्याय देण्याची भूमिका घेण्यात आलेली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांचा खासदार निवडून येण्यामध्ये कोणती अडचण नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशा वेळेला सातारा जिल्ह्यातील लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या कोणत्याही उमेदवाराला उमेदवारी न देता सर्वसामान्य कार्यकर्ता किंवा शिवसैनिकांना उमेदवारी देऊन त्यांना खासदार बनवले पाहिजे. कारण ही किमया शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली आहे.

त्यांच्या आशीर्वादामुळे सातारा जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार हिंदुराव निंबाळकर, आमदार सदाशिव सकपाळ व शंभूराज देसाई निवडून आले होते आणि यापुढेही शिवसेनेचे निष्ठावंत उमेदवार निवडून येणार आहेत. हिंदूहृदयसम्राटांचा हाच कित्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरवावा. जेणेकरून सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही सत्ता भोगण्याची संधी मिळेल.

त्यामुळे सध्या लोकसभा निवडणुकीला अवधी असला तरी प्रत्येक इच्छुक उमेदवार हा लोकशाही मार्गाने प्रयत्न करीत आहे. पण मतदारांचाही कौल महत्त्वाचा आहे. ज्या सातारा जिल्ह्यातील मतदारांनी कौल दिलेला आहे, त्याच राजकीय नेत्यांनी आत्मचिंतन करावे, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

(Edited by Amol Sutar)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT