Aseembly Session Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Siddheshwar's Chimney in Assembly session' : चिमणीबाबत मला माहिती नाही'; प्रणिती शिंदेंच्या प्रश्नावर गुलाबरावांच्या मदतीला धावले सुभाष देशमुख

सरकारनामा ब्यूरो

Solapur Politic's : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी बोरामणी आणि होटगी विमानतळ, तसेच सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. मात्र, बोरामणी विमानतळाना केंद्रीय पर्यावरण विभागाने परवानगी नाकारली, तर चिमणीबाबत मला माहिती नाही, असे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. त्यावेळी शिंदे यांच्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तर पाटील यांच्यासाठी भाजप आमदार सुभाष देशमुख हे धावून आले. त्यांनी आपापल्या पक्षाची बाजू सावरली. (Subhash Deshmukh came to help Gulabrao Patil on Praniti Shinde's question)

सोलापूरच्या (Solapur) आंतरराष्ट्रीय विमानतळाला २००८ मध्ये मंजुरी मिळाली. त्यानंतर ५७५ हेक्टर जमीन संपादित केली. मात्र, माळढोक अभारण्यामुळे ३३ हेक्टर भूसंपादन रखडले आहे. त्या जमिनीलगत सूरत-चेन्नई महामार्गाचे काम वेगाने सुरू आहेत. त्याला वनविभागचा आक्षेप नाही. पण, बोरामणी विमानतळाच्या ३३ हेक्टर जमीन संपादनाला माळढोकचा आक्षेप घेण्यात आलेला आहे. या बोरामणी विमानतळाचे काम कधी सुरू होणार आणि त्यासाठी ३३ हेक्टर भूसंपादन कधी होणार, असा प्रश्न आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी उपस्थित केला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या विमानतळासाठी ५० कोटींची तरतूद होत होती. मात्र, ती आता थांबविण्यात आलेली आहे.

शिंदे यांनी होटगी विमानतळाचा प्रश्नही उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, सोलापूरला होटगी रस्त्यावर विमानतळ आहे. त्या शेजारील सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यात आली आहे. ती पाडताना त्या परिसराला अक्षरशः छावणीचे स्वरूप आले होते. परिसरातील लोकांना घरातून बाहेर काढण्यात आले होते. चिमणी अशा पद्धतीने पाडली की दुसऱ्या दिवसापासूनच तेथून विमानसेवा सुरू होणार होती. त्या विमानतळावरून सेवा सुरू होती. पण चिमणीचा फार्स होता, त्यामागे काय राजकारण होते, ते मला माहिती नाही. चिमणी पाडल्यानंतरसुद्धा होटगी विमानतळावरून सेवा सुरू झालेली नाही.

होटगीचं विमानतळही ठप्प आहे, बोरामणी विमानतळासाठी तुम्ही तरतूद करत नाही. पूर्वी सोलापूरला किंगफिशरची विमान सेवा सुरू होती. सत्तापालट झाल्यानंतर ती बंद झाली. त्यामुळे सोलापूरबरोबर कोणत्या प्रकारचे राजकारण करण्यात येत आहे? बोरामणी विमानतळासाठी ३३ हेक्टर भूसंपादन करून त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी. तसेच, होटगी विमानतळावरून अद्याप विमानसेवा का सुरू झाली नाही, असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

प्रणिती शिंदे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले की, केंद्राच्या पर्यावरण विभागाने बोरामणी विमानतळाच्या बांधकामाची परवानगी नाकारलेली आहे. राज्यातील विमानतळाच्या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यात सोलापूर विमानतळाचाही समावेश केला जाईल. साखर कारखान्याची चिमणी हा विषय गृहनिर्माण विभागाचा (वास्तविक हा विषय नगरनियोजन विभागाकडे आहे.) त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांकडे बैठक घ्यावी लागेल.

विधानसभा अध्यक्षांनी हस्तक्षेप करत चिमणी आणि त्यानंतर विमानसेवा का सुरू झाली नाही, त्यासंदर्भात बोलण्याची सूचना केली. त्यावर ‘चिमणीच्या बाबत माझ्याकडे माहिती नाही,’ असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. त्याचवेळी भाजप आमदार सुभाष देशमुख हे मंत्र्यांच्या मदतीला धावून आले. मात्र, तिकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रणिती शिंदे यांच्या वतीने खिंड लढवली.

पृथ्वीराज चव्हाण प्रणितींच्या मदतीला

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, माळढोकचा एक पक्ष असल्याने बोरामणी विमातनळाचे काम थांबले आहे. त्या ठिकाणी एकच पक्षी आहे, तोही कोणी पाहिला नाही. तेथून जवळच असलेल्या महामार्गाला परवानगी आहे, मग विमानतळाला परवानगी का नाकारता. हा विषय महत्वाचा आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय पर्यावरण विभागाशी बोलले पाहिजे. एका पक्षासाठी संपूर्ण विकास कसा थांबवायचा. यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे.

सुभाष देशमुख म्हणतात त्यात कोणतेही राजकारण नाही

आमदार देशमुख म्हणाले की, बोरामणी विमानतळासाठी परवानगी घेण्याचा प्रयत्न होईल. पण, होटगी विमानतळाशेजारील कारखान्याची चिमणी पाडण्याचा आदेश न्यायालयाने दिलेला आहे. त्यात कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही. सुमारे २५ ते ३० हजार शेतकऱ्यांचा विरोध हेाता का, तर शंभर टक्के विरोध होता. पण त्यांना वाटतं होतं की चिमणी पाडल्यामुळे कारखाना बंद पडेल, या भावनेतून त्यांचा विरोध होता.

चिमणी पाडण्यामागे कोणतेही राजकारण नव्हते. विमान लॅंड होण्यासाठी अडचण होती, त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतर ती चिमणी पाडण्यात आलेली आहे. सोलापूरकरांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन विमानसेवा तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी देशमुख यांनी केली. त्यावर पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी सोलापूरकरांच्या भावना लक्षात घेऊन तातडीने यासंदर्भात बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्यात येईल, असे उत्तर दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT