Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कमिशनबाजीमुळे उदयनराजेंच्या आघाडीचा शंभर टक्के कडेलोट होणार... शिवेंद्रसिंहराजे

Umesh Bambare-Patil

सातारा : मुंबई दौरा मनासारखा न झाल्याने उदयनराजेंनी चवताळून, चिडून माझ्यावर आरोप केले आहेत. नेहमीप्रमाणे कुजकेपणा त्यांच्या बोलण्यात नव्हता. कमिशनबाजीमुळे त्यांची सातारा विकास आघाडी धोक्यात आल्याने या नैराश्येतून ते बिनबुडाचे आरोप करत आहेत. निवडणुकीत ५० नगरसेवक निवडून आणण्याची त्यांना गॅरंटी आहे तर घाबरायचं का, असा प्रश्न करून यावेळेस खासदारांच्या आघाडीचा सातारकर १०० टक्के कडेलोट करतील, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या आरोपाला शिवेंद्रसिंहराजेंनी आज पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिले. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘मला अलगद आमदारकी मिळालेली नाही, तर तुम्हाला पाडून दहा हजारांच्या मताधिक्क्याने निवडून येत ती मिळवली आहे. त्यामुळे त्यांचे वक्तव्य बालिशपणाचे आहे. पालिकेच्या निवडणुकीत ते दोन वॉर्डमधून लढले, पण एकातून पराभूत झाले. ते जर युगपुरूष आहेत तर का पराभूत झाले?

पालिका, आमदारकी, खासदारकी ते पराभूत झाले आहेत. मी मताधिक्क्याने निवडून आलेलो आहे, हे त्यांनी विसरू नये.’’ मुंबईच्या दौऱ्यात त्यांच्या मनासारखं झालं नाही म्हणून ते तेथून आल्यावर माझ्यावर चवताळून, चिडून बोलले, एरव्ही ते कुजक्यासारखे बोलतात. पालिकेच्या नवीन इमारतीसाठी ७० कोटी घालविण्याचे नेमके कारण त्यांनी सांगावे. जुन्या इमारतीत त्यांनी काय दिवे लावले म्हणून नवीन इमारत बांधत आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

ज्या जागेवर टाऊन हॉलचे रिझव्हेशन आहे. तेथे पालिकेची इमारत बांधून १३ गुंठे जागा कल्याणींना परत का दिली, या मागचे गौडबंगाल सांगावे. कदाचित त्यांची स्पॉन्सरशिप आहे का, असा प्रश्नही शिवेंद्रसिंहराजेंनी केला. पंतप्रधान आवास योजनेचे काम प्रत्येक वेळी नाशिकच्या ठेकेदाराला का असा प्रश्न करून त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांची क्लिप पत्रकार परिषदेत ऐकवली.

पालिकेत टक्केवारी चालते हे यातून स्पष्ट होत असून आता सातारकर त्यांच्या सातारा विकास आघाडीचा कडेलोट करणार हे निश्चित आहे, असे स्पष्ट करुन शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘२० वर्षे जंतूनाशक पावडरचे टेंडर सोलापूरला का दिले जाते, असा प्रश्न करून तेथील पावडर इतकी चांगली आहे की साताऱ्यातील रोगाराई पळून जाईल. स्वच्छता अभियानात पालिकेला मिळालेला पुरस्कार हा प्रशासकांमुळे मिळाला आहे. त्याचे श्रेय त्यांनी घेऊ नये. सातारा विकास आघाडीने या पुरस्कारासाठी काहीही केलेले नाही. केवळ बोगसपणा केला आहे.’’

कास धरणासाठी एक तरी बैठक घेतल्याचे दाखवावे. पैशाअभावी प्रकल्प रखडला. त्यावेळी तुम्ही दादांकडे निवेदन देण्यासाठी गेला होता. शाहूपुरीचे सरपंच संजय पाटलांचे सरपंचपद वाचविण्यासाठी रवी साळुंखेंनी पालिकेच्या हद्दवाढीचा जिल्हा परिषदेत ठराव केला नाही. ‘कोण दादा...’ ते म्हणतात, मग अजितदादांना निवेदन देतानाचा उदयनराजेंचा फोटो दाखवत, हे कशासाठी दादांकडे गेले होते, असाही त्यांनी प्रश्न केला.

प्रत्येकवेळी समोरासमोर म्हणतात आणि जागा बदलता, असे सांगून ते म्हणाले, ‘‘जम्बो कोविड रूग्णालय संग्रहालयात केल्यामुळे हजारो लोकांचे कोविडमध्ये प्राण वाचले. त्यावेळी सातारा पालिकेने काहीही केले नाही. राजपथावरील दीपमाळेचा प्रकाश कारंज्यांत पडला आहे. त्यांच्या कारभारामुळे आगामी निवडणुकीत सातारकर सातारा विकास आघाडीचा कडेलोट करतील. त्यांच्या आघाडीचा पलिकेतून कडेलोट होईल. त्यांना घरी बसण्याची वेळ आली आहे.’’ अशोक मोने निवडून आले तर मी मिशा व भुवया काढीन, असे म्हणणाऱ्या उदयनराजेंनी मिशा व भुवया का काढल्या नाहीत, असा प्रश्न शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थित केला.

हा तर त्यांचा दुटप्पीपणा...

साताऱ्यातील राजवाडा ही आमची खासगी मालमत्ता आहे. तो परत मिळावा, अशी मागणी उदयनराजे व त्यांची आई राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी शासनाकडे आहे. हा त्यांचा दुटप्पीपणा नाही का, असा टोलाही शिवेंद्रसिंहराजेंनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT