Bhagirath Bhalke-Prashant Paricharak-Abhijeet Patil-Samadhan Autade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pandharpur-Mangalvedha : पंढरपूर-मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची स्पेस कोण भरून काढणार?

हुकूम मुलाणी

Mangalvedha, 19 May : सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात चुरशीने मतदान झाले. पण, 4 जूननंतर पंढरपूर-मंगळवेढ्यातून महाविकास आघाडीकडून कोण तुतारी फुंकणार, याचीच चर्चा सुरू झाली आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपच्या तंबूत दाखल झाले आहेत, त्यामुळे पंढरपूर-मंगळेवढ्यातील नेतृत्वाची राष्ट्रवादीतील स्पेस कोण भरून काढणार, असाही सवाल उपस्थित होत आहे.

पंढरपूर-मंगळवेढा (Pandharpur-Mangalvedha) पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांचा निसटता पराभव झाल्यानंतर त्यांना विठ्ठल कारखानाही राखता आला नाही. पण, त्यानंतर अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांच्या रूपाने शरद पवार यांनी या मतदारसंघात नवीन चेहरा गळाला लावला. शरद पवारांनी विठ्ठल कारखान्यावर कार्यक्रम घेत अभिजीत पाटलांचा थेट राष्ट्रवादीत प्रवेश घडविला. त्याच कार्यक्रमात शरद पवारांनी अभिजित पाटील यांची विधानसभेची उमेदवारीचे संकेत दिले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अभिजित पाटील यांच्या राष्ट्रवादीतील एन्ट्रीने नाराज झालेले भगीरथ भालके यांनी हैदराबाद येथे जाऊन केसीआर यांच्या बीएसआरमध्ये प्रवेश केला. पण केसीआर यांच्या बीआरएसचा तेलंगणा विधानसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाला, त्यामुळे भालके समर्थकांचीही चलबिचल सुरू झाली आहे.

दुसरीकडे, सत्ताधारी आमदार समाधान आवताडे यांनी लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी परिश्रम घेतले. त्यांच्यासोबत प्रशांत परिचारकही होते. या दोघांपैकी एक जण हा भाजपचा विधानसभेचा उमेदवार असणार आहे. पण, राष्ट्रवादीचे या मतदारसंघातील संभाव्य उमेदवार अभिजीत पाटील यांना निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गळाला लावले. त्यामुळे भाजपमध्ये विधानसभेसाठी आमदार समाधान आवताडे, अभिजीत पाटील आणि प्रशांत परिचारक हे तीन दावेदार झाले आहेत. मात्र, फडणवीसांनी या तिघांनाही लोकसभेसाठी या मतदारसंघातून मताधिक्य देण्याची अट घातली आहे, त्यामुळे मताधिक्य मिळाले तर संधी कुणाला मिळणार याची चर्चा आता पंढरपूर-मंगळवेढ्यात सुरू आहे. एकाला संधी मिळाल्यावर दुसरे दोघे काय करणार, असाही प्रश्न आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना भगीरथ भालके यांनी पाठिंबा दिला. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून भालके यांना विधानसभेची बांधणी करणे शक्य असतानाही त्यांनी ठराविकच सभा घेतल्या. त्यामुळे भालके यांचा विधानसभेसाठी काय निर्णय असेल, हा प्रश्न आहे.

सद्यस्थितीत महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची क्रेझ दिसून आली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पोटनिवडणुकीत लाखापेक्षा अधिक मते मिळाल्यामुळे ही जागा राष्ट्रवादीलाच मिळणार, हे निश्चित मानले जात आहे, त्यामुळे या मतदारसंघातून त्यांचा उमेदवार कोण असणार, याची चर्चा सध्या सुरू आहे. अभिजीत पाटील यांना भाजपतून संधी न मिळाल्यास ते परत महाविकास आघाडीत येणार का? त्याच पद्धतीने प्रशांत परिचारक यांच्याबाबत तशी चर्चा सुरू आहे.

सोलापूरच्या राजकारणात अकलूजचे मोहिते पाटील, सांगोल्याचे देशमुख आणि पंढरपूरचे परिचारक हे एकत्र समीकरण होते. ते विधानसभा निवडणुकीत पुन्हा दिसणार का?, भगीरथ भालकेही महाविकास आघाडीचे उमेदवार होणार का? याचीही चर्चा रंगली आहे. पण त्यासाठी आपल्याला चार जूनचा निकाल आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत वाट बघावी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT