Kolhapur Water Supply Scheme Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Water Supply Issue : कोल्हापूरच्या थेट पाइपलाइनच्या मुख्य वीजपंपाची वायर कापली; घटनेमागे राजकारण असल्याची चर्चा

Rahul Gadkar

kolhapur News : कोल्हापूर शहराच्या जिव्हाळ्याची थेट पाइपलाइन योजना पूर्णत्वास आली असताना त्याच्या कामात अडथळे आणण्याचे काम होताना दिसत आहे. दूधगंगा (काळम्मावाडी) धरण प्रकल्पावरील वीजपंपास विद्युत पुरवठा करणारी वायर अज्ञातांनी कापल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती ‘सरकारनामा’ला दिली आहे. त्यानंतर कोल्हापूर महापालिकेचे अधिकारी खडबडून जागे झाले असून, विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकरणावर बोलण्यास संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र नकार दिला आहे. (Wire of main electric pump of Kolhapur water supply scheme was cut)

गेल्या ११ वर्षांपासून रखडलेल्या दूधगंगा धरणावरून कोल्हापूर शहरासाठी करण्यात आलेल्या थेट पाइपलाइनचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. कोल्हापूरकरांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी सर्वस्व पणाला लावून ही योजना मंजूर केली. या ना त्या कारणाने रखडलेली थेट ही योजना अखेर ११ वर्षांनंतर पूर्ण झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिवाळीच्या मुहूर्तावर कोल्हापूरकरांना पाणीपुरवठा करण्याची धडपड महापालिका प्रशासनाने सुरू केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या योजनेचे उद्‌घाटन करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनामुळे या योजनेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलावा, अशी मागणी होती. मात्र, त्यापूर्वीच अज्ञातांनी काळम्मावाडीतील थेट पाइपलाइनचा वीजपुरवठा तोडून टाकला आहे.

दरम्यान, या प्रकरणानंतर महापालिका अधिकारी खडबडून जागे झाले असून, प्रकल्पाच्या ठिकाणी खासगी सुरक्षारक्षक नेमले आहेत. तसेच, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही तातडीने लावण्यात आलेले आहेत. दरम्यान, या प्रकाराबाबत महापालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी यावर बोलणे टाळले.

थेट पाइपलाइनचा श्रेयवाद

गेल्या ११ वर्षांपासून तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी या योजनेचा पाठपुरावा करून काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र, या योजनेच्या श्रेयवादावरून कोल्हापूर जिल्ह्यात नव्या राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेला मंजुरी दिली असल्याचा दावा करतात. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीही आपण पाठपुरावा केला असल्याचा दावा करतात, त्यामुळे या योजनेवरून आता श्रेयवादाला सुरुवात झाली आहे.

घटनेला राजकीय वास

दूधगंगा धरणावरील पाणी योजनेचा वीजपुरवठा तोडल्याच्या घटनेतून राजकीय वास येऊ लागला आहे. दिवाळीपूर्वी या योजनेचा लाभ शहरवासीयांना मिळणार असताना ही घटना घडल्याने त्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. ही घटना का आणि कोणी केली? हे समोर आले नसले तरी त्यामागे राजकारण असू शकते, अशी चर्चा सुरू आहे.

सोलापूरहून मागवली मशिनरी

पाणी योजनेच्या वीजपंपाची वायर कापल्यानंतर ती जोडणे अशक्य होते. ही वायर जोडण्यासाठी सोलापूरहून एक टीम मशिनरीसह प्रकल्प स्थळावर दाखल झाली. आज सकाळी ही वायर जोडण्याचे काम पूर्ण झाले. त्यानंतर टेस्टिंग घेऊन या योजनेचे उद्‌घाटन होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT