Ahmednagar Politics  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Politics : 'पोलिसांनी सत्ताधाऱ्यांचे बाहुले होऊ नये'; राऊतांवर गुन्हा दाखल, काँग्रेस आक्रमक!

Pradeep Pendhare

Ahmednagar Political News : शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर नगरमध्ये गुन्हा दाखल झाला. महाविकास आघाडीचे उमेदवाराच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत भडकावू भाषण केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला आहे. काँग्रेसचे नगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी पोलिस प्रशासनावर यावरून गंभीर आरोप केला. 'पोलिसांनी सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले होऊ नये', असा सल्ला दिला आहे. (Latest Marathi News)

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंकेंच्या प्रचारासाठी नगरमध्ये आठ मे रोजी सभा झाली. या सभेत शरद पवारांसह (Sharad Pawar) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत सहभागी झाले होते. खासदार राऊत यांनी या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली होती. खासदार राऊतांनी केलेल्या टीकेची दखल नगर पोलिस प्रशासनाने घेतली आहे.

नगर कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून, पोलिस कर्मचारी अतुल काजळे यांनी फिर्यादी आहेत. संजय राऊत यांच्यावर दाखल गुन्ह्यावर काँग्रेसचे नगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आगपाखड केली आहे. याशिवाय त्यांनी पोलिस प्रशासनाला सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले होऊ नका, असा सल्ला दिला आहे.

किरण काळे म्हणाले, "केंद्र सरकार देशातील ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या सरकारी यंत्रणांचा गैरवापर मागील दहा वर्षांमध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीने करत आहे. पोलिस हा राज्य सरकारचा विषय आहे. आता या यंत्रणाचा देखील सरकारकडून या निवडणुकीत गैरवापर सुरू झाल आहे. एखाद्या वक्तव्याची सोयीस्कररीत्या चिरफाड करून राजकीय आकसातून गुन्हे दाखल केले जात आहेत". मात्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र (Maharashtra) आहे. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा हा महाराष्ट्र आहे. दिल्ली पुढे महाराष्ट्राला झुकविण्याचे आजवर अनेक प्रयत्न झाले. पण महाराष्ट्राच्या स्वाभिमानी नेत्यांनी ते मनसुबे हाणून पाडले. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर यापूर्वी देखील सत्तेचा गैरवापर करून खोट्या-नाट्या कारवाया करण्यात आल्या. त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले. मात्र ते लढवय्ये आहेत. ते थांबले नाहीत आणि थांबणार ही नाहीत, असे काळे यांनी म्हटले.

काय म्हणाले होते, संजय राऊत?

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झाला. म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे. औरंगजेब याचा जन्म गुजरातमध्ये झाला आहे. ती जी माती आहे, ती औरंगजेबाची माती आहे. त्या मातीतले हे दोन व्यापारी आहेत. औरंगजेबचा जन्म नरेंद्र मोदींच्या गावात झाला आहे, इतिहास पाहा तुम्ही. दावत नावाच्या गाव आहे. अहमदाबादच्या बाजूला. औरंगजेब तिथे जन्माला आला आहे. त्यामुळे ते आपल्याशी औरंगजेबी वृत्तीने वागत आहेत. 27 वर्षे औरंगजेब महाराष्ट्र जिंकण्यासाठी लढत होता. पण औरंजेबाला आम्ही या महाराष्ट्रात गाडून त्याची कबर खणली आहे. तेव्हा नरेंद्र मोदी तून कौन हे, असे वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT