CM Eknath Shinde, Neelam Gorhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Neelam Gorhe News : विधान परिषदेच्या उपसभापतींकडून मुख्यमंत्र्यांची पाठराखण ; म्हणाल्या, 'तिसऱ्या व्यक्तीने...'

Arvind Jadhav

Nashik News : शिंदे गटाचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबाराच्या प्रकरणानंतर कोणी काही तरी आरोप करतो, याला काही अर्थ नाही. तिसऱ्या व्यक्तीने तर त्यात नाक खूपसण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करीत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठराखण केली. (Neelam Gorhe support to CM Eknath Shinde)

कल्याण पूर्व भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या शहरप्रमुखांवर थेट पोलिस ठाण्यातच केलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर खळबळ उडाली. यानंतर मीडियात स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री शिंदे यांना आपण कोट्यवधी रूपये दिल्याचा आणि शिंदे यांच्यामुळे गुन्हेगारी वाढत असल्याचा दावा आमदार गायकवाड यांच्याकडून करण्यात आला.

या दाव्यालाच सध्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून हवा देण्यात येत असून, एकनाथ शिंदेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. ठाकरे गटाचे संजय राऊत मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सातत्याने करत आहेत. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा आंधारे यांनीही शिंदेच्या अटकेची मागणी केली. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आलेल्या नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री शिंदेंची पाठराखण केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “गोळीबार झाल्यानंतर आरोपी काय बोलत असतो, हे गांर्भीयाने घ्यायचं नसतं. आरोपी स्वत:ला वाचविण्यासाठी असे करू शकतात. आरोपीने जो गुन्हा केला त्यावरुन भारतीय दंड विधानानुसार कारवाई होते. गुन्हा घडलेला असताना आरोप केला म्हणून तक्रार करणे चुकीचे आहे. इतरांनी त्यात बोलण्याचे कारणं नाही”, असा टोलाही गोऱ्हे यांनी राऊत यांचे नाव न घेता लगावला.

राजीनाम्याची अवस्था रुग्णासारखीच...

राजीनामा जीवंत आहे... राजीनामा खिशात आहे... सध्या राजीनाम्याची अवस्था थेट रुग्णासारखी झाल्याची प्रतिक्रिया गोऱ्हे यांनी व्यक्त करत मंत्री छगन भुजबळ यांचीच फिरकी घेतली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट ओबीसी एल्गार मेळाव्यात भुजबळ यांनी केला.

राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिल्याच्या मुद्यावर विरोधकांनी भुजबळांवर टीका देखील केली. यानंतर रविवारी याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले होते की, माझा राजीनामा अजित पवार यांच्या कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला आहे. तो राजीनामा अद्याप जीवंत असल्याचा सूचक इशारा त्यांनी दिला होता. याबाबत उपसभापती गोऱ्हे यांना विचारले असता त्यांनी राजीनाम्याच्या वेगवेगळ्या अवस्था असतात, याकडे लक्ष वेधले.

राजीनामा जिवंत असतो, तो खिशात असतो आणि राजीनाम्याची अवस्था रुग्णासारखी झाली आहे. राजीनामा मेलेला आहे, हे मला आत्ता कळालं, अशा शब्दात गोऱ्हे यांनी भुजबळांची फिरकी घेतली. तसेच मंत्रिपदाचा राजीनामा घेणे किंवा फेटाळणे ही बाब मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यापालांच्या अख्त्यारीतील असल्याचेही गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT