MLA Prajakt Tanpure Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Prajakt Tanpure on Central Govt : आमदार तनपुरे भडकले ; म्हणाले, 'मोदींची योजना म्हणजे...'

Pradeep Pendhare

Nagar News : मिरी - तिसगाव प्रादेशिक योजनेचे संथ गतीने सुरु असल्याच्या कामावरून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे चांगलेच आक्रमक झाले आहे. "पाणी योजनेत सावळा गोंधळ असून, याबाबत विधानसभेत सरकारचे लक्ष वेधणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही योजना म्हणजे, घर घर जल है... नसून हर घर जल नही... यापद्धतीची आहे", अशी शेलक्या शब्दात आमदार तनपुरे यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. (Prajakt Tanpure on Central Govt)

मिरी - तिसगाव प्रादेशिक योजनेचे काम संथ गतीने चालले आहे. ही योजना तातडीने पूर्ण करत योजनेतील समाविष्ट गावांना येत्या उन्हाळ्यापूर्वी पाणी द्या, असा आदेश आमदार प्राजक्त तनपुरे यांनी या योजनेशी संबंधित आधिकाऱ्यांना दिला. दीडशे कोटी रुपये खर्चाच्या या योजनेचा आढावा आमदार तनपुरे यांनी घेतला. याच बैठकीत तनपुरे यांनी शेलक्या शब्दात राज्य व केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली.

या बैठकीत योजनेच्या पाईप निकृष्ट दर्जाच्या आहेत. या संदर्भात जो सर्व्हे करण्यात आला तो चुकीचा करण्यात आलाय. काम संथ गतीने चालू असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. यावेळी गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता ए. पी. धगधगे, अनिल सानप, गटशिक्षणाधिकारी अनिल भवर, रफिक शेख, अमोल वाघ, राहुल गवळी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार तनपुरे म्हणाले, "योजना सुरू करण्यापूर्वी गावांतर्गत पाईप लाईनचा सर्व्हे केला. मात्र अगोदर चार किलोमीटर पाईप टाकावी लागेल, असा प्रस्ताव बनवला. मात्र त्यानंतर नऊ किलोमीटर वाढीव पाईपचा प्रस्ताव मंजुरीसाठी दिला गेला, हे कसे झाले ? यात काहीतरी चुकीचे आहे. योजनेत ज्या अडचणी आहेत त्या दूर करा".

जलजीवन मिशन योजनेच्या पाणी योजनेत सावळा गोंधळ आहे. सर्व्हे करणाऱ्या एजन्सींवर काय कारवाई केली ? असा प्रश्न करून हा सर्व प्रकार अजब आहे. सर्व्हे करणारी एजन्सी यांनी काय घरात बसून सर्व्हे केला का ? याविषयी मी विधानसभेत लक्षवेधी करणार असल्याचा इशारा अधिकाऱ्यांना आमदार तनपुरे यांनी दिला आहे.

...तर अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा मंत्री करणार

घर घर जल है, यापद्धतीने ही योजना व्हायला हवी होती. मात्र हर घर जल नही, यापद्धतीने योजनेचे काम चालू आहे. पंतप्रधान मोदींनी सांगितल्याने आम्ही या योजनेवर विश्वास ठेवला. मात्र गतिमान शासनाच्या काळात आपण वावरत असूनही हे काम मात्र संथ गतीने चालू आहे. एक लक्ष लीटर क्षमतेची पाण्याची टाकी दिवसातून दोन वेळा भरली जाईल, असे अधिकारी सांगतात.

जे यापद्धतीने टाकी भरून देतील त्या अधिकाऱ्यांना आमच्या सरकारच्या काळात आम्ही पाणीपुरवठा मंत्री करु. पाणी योजनेच्या पाईपलाईन टाकण्याचा सर्व्हे करणाऱ्या कंपनीने काय घरात बसून सर्वे केला का ? असाही सवाल अधिकाऱ्यांना तनपुरे यांनी विचारला.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT