Buldhana, 31 January : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे जलसंपदा मंत्री (तापी, विदर्भ आणि कोकण) गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय वाद संपूर्ण राज्य जाणून आहे. एकेकाळी हे दोघे एकाच पक्षात होते. मात्र, भाजपची सत्ता आल्यानंतर २०१४ पासून दोघांमध्ये अंतर पडत गेले. त्या दोघांनी वाद मिटविण्यासाठी खडसेंच्या सूनबाई आणि केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे यांनी मध्यंतरी पुढाकार घेतला होता. मात्र, या दोघांच्या वादापुढे त्यांनीही हात टेकल्याचे रक्षा खडसेंच्या ताज्या विधानावरून दिसून येत आहे.
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे विद्यमान संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) हे एकेकाळी एकाच पक्षात म्हणजे भारतीय जनता पक्षात होते. खडसे हे राज्याचे नेतृत्व करत होते. विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. मात्र, भाजपची २०१४ मध्ये राज्यात सत्ता आली आणि त्या सरकारमध्ये महसूल मंत्री झालेल्या खडसेंवर भोसरी जमीन गैरव्यवहाराचा आरोप झाला. त्यानंतर खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यांचे ग्रह फिरले.
त्या राजीनाम्यानंतर खडसे हे भाजपासून दुरावत गेले. आपला मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) असल्याचा आरोप खडसेंकडून होऊ लागला. त्याच काळात महाजन हे फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागले, त्यामुळे खडसेंची महाजनांबरोबर खटके उडू लागले. आणि एकेकाळी एकाच पक्षात असलेल्या जळगाव जिल्ह्यातील या दोन नेत्यांमध्ये राजकीय वैर निर्माण झाले. त्या दोघांमध्ये राजकीय अंतर वाढत गेले.
भाजपवर नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांनी रावेरमधून निवडणूक लढविण्यास नकार दिला. त्यांनी भाजपबाबत काहींशी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून आले. त्या वेळी या दोघांमध्ये मनोमिलन घडवून आणण्याचा प्रयत्न झाला. मध्यंतरी खडसे यांनीही भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारी दाखवली होती. मात्र त्यांचा प्रवेश ऐनवेळी थांबविण्यात आल्याची माहिती आहे, त्यामागे कोण आहे, हेही खडसेंनी संकेतांच्या माध्यमातून सांगितले होते.
त्याच लोकसभा निवडणुकीदरम्यान एकनाथ खडसे यांच्या स्नूषा आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी महाजन आणि खडसे वादावर तोडगा काढण्याचे अनेक महिने प्रयत्न केले होते. मात्र, त्यात त्यांना अद्यापही यश येऊ शकले नसल्याचे दिसून येत आहे. कारण, दोघांच्या वादावर तोडगा काढून मनोमिलन करण्यापुढे हात टेकल्याचत्य त्यांनी केलेल्या ताज्या विधानावरून दिसून येत आहे.
बुलढाणा येथे आज नियोजन समितीच्या बैठकीसाठी रक्षा खडसे आल्या होत्या. त्यावेळी त्यांना खडसे-महाजन मनोमिलनाबाबत विचारलं असतं, त्या म्हणाल्या हा विषय आता जुना झाला आहे. आता तुम्ही त्या दोघांनाच याबद्दल विचारा, अशी काहींशी तटस्थ राहण्याची भूमिका रक्षा खडसे यांनी घेतल्याचे त्यांच्या या विधानावरून दिसून येते.
राज ठाकरे त्यांच्या पक्षाचा निर्णय घेऊ शकतात
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेबाबत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे म्हणाल्या, राज ठाकरेंचा स्वतःचा पक्ष आहे. आम्ही त्यांना मदत केली आहे, त्यांनीही आम्हाला मदत केली आहे. त्यांच्या पक्षाचा निर्णय ते घेऊ शकतात. राज्यात महायुतीचे सरकार आहे, त्यामुळे कोणत्याही जिल्ह्याचा पालकमंत्री हा महायुतीचा आहे, त्यामुळे पालकमंत्री कुठल्या पक्षाचा आहे, याला महत्त्व नाही, तो महायुतीचा आहे आणि सर्वांनी त्यांचा आदर करायलाच पाहिजे, असेही त्यांनी पालकमंत्रिपदाबाबत भाष्य केले.
राजकीय निर्णय लग्न आणि समारंभात ठरत नसतात
नीतेश राणे यांनी बुरखा घालून परीक्षेला प्रवेश न देण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे, त्यांना गैरप्रकार रोखायचे असतील, मुलांच्या परीक्षा सारख्या होण्यासाठी त्यांचा प्रयत्न असेल, असेही रक्षा खडसे यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवर त्या म्हणाल्या की, राजकीय निर्णय हे लग्न कार्यक्रमात किंवा बाहेर कुठे ठरत नसतात. राजकीय लोकांचे व्यक्तिगत संबंध असतात. राजकीय भविष्य हे उद्घाटन किंवा लग्न समारंभात ठरतं नसतं...!.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.