Yogi Adityanath  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhule Loksabha News : योगी आदित्यनाथ यांनी टाकला धार्मिक ध्रुवीकरणाचा डाव!

Sampat Devgire

Yogi Adityanath News: धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांची प्रचार सभा झाली. मालेगाव येथील प्रचाराच्या या शेवटच्या सभेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धार्मिक ध्रुवीकरणाचा डाव टाकला. योगी आदित्यनाथ यांनी आपल्या २० मिनिटांच्या भाषणात प्रामुख्याने काँग्रेस पक्षावर गंभीर टीका केली.

योगी आदित्यनाथ यांच्या भाषणात अयोध्येतील श्रीराम मंदिर, पाकिस्तान, दंगे, गोहत्या, विरासत टॅक्स, अल्पसंख्याकांना आरक्षण, मुस्लिम समाज, रस्त्यावरील नमाज, मशिदी वरील भोंगे, गुंडांना यमसदनी पाठवणे हे मुद्दे होते. त्या भोवतीच आक्रमक भाषण करीत ते उपस्थितांना हे चालू द्यायचे का? असा प्रश्न करून उपस्थितांची संवाद साधत होते.

योगी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करून हा जाहीरनामा खरे तर मुस्लिम लीग पक्षाचा जाहीरनामा वाटतो आहे. या जाहीरनाम्यात ते विरासत टॅक्स लावणार आहेत. त्याद्वारे तुमची वडिलोपार्जित संपत्ती हडप करण्याचा त्यांचा डाव आहे. हा कर म्हणजे औरंगजेबाचा जिझिया कर आहे. मुस्लिम समाजाला त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे खाण्यापिण्याचा अधिकार देणार आहेत. याचा अप्रत्यक्ष अर्थ गोहत्येला परवानगी देणार आहे.

मागासवर्गीयांचे आरक्षण काढून मुस्लिम समाजाला देणार आहेत. असे अनेक आपत्ती जनक मुद्दे असून हा जाहीरनामा म्हणजे भारताच्या विभाजनाची सुरुवात आहे अशी टीका त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर येण्यापूर्वी २०१४ मध्ये जगात भारताला कोणतीही प्रतिष्ठा नव्हती, असे योगी म्हणाले. मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी केलेल्या कामामुळे आता जगभर भारताची प्रतिष्ठा वाढली आहे.

सीमा सुरक्षित झाल्या आहेत. दहशतवादी हल्ले थांबले आहेत. आता कुठे थोडे जरी काही घडले तर तातडीने पाकिस्तान स्वतःच खुलासा करते की, यामध्ये आमचा हात नाही. ही सगळी सुधारणा केवळ भारतीय जनता पक्ष आणि मोदी सत्तेवर आल्यामुळे होऊ शकली आहे. मोदी यांनी विकासाचे अतिशय मोठे काम केले आहे, असे योगी म्हणाले.

पाकिस्तानची जेव्हढी लोकसंख्या आहे, भारतातील तेव्हढ्या लोकांची गरिबी दूर करण्यात आली आहे. आयुष्यमान भारत योजनेद्वारे ६० कोटी लोकांना ५ लाख रुपयांपर्यंतचा उपचार मोफत मिळतो. ५० कोटी लोकांची जनधन खाती उघडण्यात आली. काँग्रेसच्या काळात गॅस सिलेंडर मिळतच नव्हते. मोदी यांनी सगळ्यांना मोफत गॅस सिलेंडर उपलब्ध केले आहे.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

चार कोटी घरे बांधण्यात आली आहे. उर्वरित सर्व बेघर लोकांना भविष्यात घरे मिळणार आहेत, असा दावा योगी यांनी केला. गरिबांच्या कल्याणासाठी मोदी सरकार अतिशय मोठे काम करीत आहे. पायाभूत सुविधांचा प्रचंड विकास झाला आहे. प्रत्येक घरात नळ आणि नळाला पाणी आले आहे. असे असतानाही जर कोणाला पाकिस्तान विषयी प्रेम वाटत असेल तर त्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही. अशा लोकांना पाकिस्तानात पाठवून द्या. भारतात अजिबात ठेवता कामा नये. पाकिस्तानात जाऊन भीक मागायची वेळ आल्यावर त्यांचे डोके ठिकाणावर येईल, असे योगी म्हणाले.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT