BJP MLA Harish Pimple Letter Sarkarnama
विदर्भ

Barshi Takli Water Supply Scheme : भाजप आमदार हरीश पिंपळेंचे पत्र पळविणार बार्शीटाकळीकरांच्या तोंडचे पाणी; शहरात संताप

Atul Mehere

Akola News : मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी उपमुख्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून बार्शीटाकळी शहरवासीयांसाठी मंजूर झालेली पाणीपुरवठा योजना रद्द करून केंद्र सरकारची अमृत 2.0 योजना मंजूर करण्यात यावी, अशा मागणीचे पत्र दिले आहे. हे पत्र सोशल माध्यमात व्हायरल झाले असून, आमदारांच्या पत्राबाबत संताप व्यक्त केला जात आहे. (BJP MLA Harish Pimple's demand to cancel the water supply scheme of Barshi Takli)

दरम्यान, आमदार हरीश पिंपळे यांच्या या पत्रावरून सध्या बार्शीटाकळी येथील काही सर्वधर्मीय युवकांनी पत्रकार परिषद घेऊन जी योजना मंजूर झाली, तीच लवकर राबविण्यात यावी, अशी मागणी केली आहे; अन्यथा सोमवारी (ता. १८ सप्टेंबर) मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मूर्तिजापूर मतदारसंघातील बार्शीटाकळी ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर होऊन आठ वर्षे झाली. मात्र, येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. बार्शीटाकळी नागरिकांसाठी सर्वांत मोठी पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लागलेली नाही. सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाद्वारे बार्शीटाकळीला पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून मंजूर झालेली पाणी योजना रद्द करून त्याऐवजी केंद्र सरकारची अमृत 2.0 ही योजना बार्शीटाकळीसाठी मंजूर करण्याचे पत्र दिले.

आमदार पिंपळे यांच्या पत्रामुळे बार्शीटाकळीसाठी मंजूर झालेली योजना रद्द होण्याची शक्यता आहे. बार्शीटाकळी ग्रामपंचायत असताना ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठ्यासाठी १३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. दरम्यानच्या काळात ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले. तेव्हापासून नगर पंचायतीचे अधिकारी हे पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव शासन दरबारी पाठवत होते. मात्र, त्याला यश आले नव्हते.

सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाच्या माध्यमातून बार्शीटाकळी पाण्याची समस्या सुटण्याची आस होती. मात्र, आमदार पिंपळे यांच्या पत्रामुळे तेही नामंजूर करण्यात आल्याचे कळते आहे. याबाबत प्रशासनाकडून योग्य उपाययोजना करण्यात यावी, अन्यथा सोमवारी (ता. १८ सप्टेंबर) मोर्चा काढण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.

पत्रकार परिषदेला सर्वधर्मीय युवकांमध्ये प्रकाश खाडे, उमेश राऊत, अष्युव खान, अरविंद काकड, मोहम्मद रिजवान, इमरान खान, अभ्याज खान, दिलदार खान, इरशाद, साजिद खान, आसिम, उमेर खान आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT