Kishor Tiwari Sarkarnama
विदर्भ

Modi's Yavatmal Tour : शेतकरी विधवा, महिला पंतप्रधानांना जाब विचारणार

सतीश हरिश्चंद्र येटरे

Modi's Yavatmal Tour : गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदी सरकारने सतत दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांचे शोषण होत आहे. सरकारल्या निष्काळजीपणामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. महागाई बेलगाम झाली आहे. बेरोजगारीच्या आकड्यांनी कळस गाठला आहे. सर्वत्र गभ्रष्टाचार बोकाळला आहे. अशा सर्व ज्वलंत मुद्द्यांरव नरेंद्र मोदी तोंड कधी उघडणार ? असा थेट प्रश्न शेतकरी नेते आणि शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांनी नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ जिल्हा दौऱ्याआधी उपस्थित केला. यवतमाळ येथे ते बोलत होते.

2014 मधील लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी (Lok Sabha Election 2014) यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी या गावी ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम गाजावाजा करून घेण्यात आला. या ठिकाणी करून दिलेली सर्व आश्वासने आता दहा वर्षांनंतर खोटी ठरली असल्याचे तिवारी म्हणाले. भाजप सरकार हवालदिल शेतकरी, बेरोजगार व सामान्य माणसांची सतत फसवणूक करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यासंबंधीचे पत्र त्यांनी नरेंद्र मोदींना पाठविले असून त्यात अनेक गंभीर वास्तविक विषयावर प्रकाश टाकला आहे. केंद्रात सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपट करू, दोन कोटी रोजगार देऊ, महागाईवर लगाम आणू, पेट्रोल-डिझेल, गॅसचे दर कमी करू, शेतकऱ्यांच्या दुर्दैवी आत्महत्या थांबतील आणि भ्रष्टाचार समूळ नष्ट करू, अशी आश्वासने भाजपने दिली होती. गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदींनी दिलेला एकही शब्द पाळलेला नाही, असे तिवारी म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकीकडे शेतीवरचा खर्च दुप्पट झाला तरी सरकार हमीभाव सुद्धा द्यायला तयार नाही. कापूस, सोयाबीनचे दर पडले आहेत. केंद्र सरकारच्या नोडल एजन्सी सीसीआय आणि नाफेड माल खरेदी करण्यास तयार नाहीत. तुटपुंजे केंद्र उघडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे. शिक्षण, आरोग्य यांच्यावरील खर्च तिप्पट झाला आहे. बेलगाम महागाईने सामान्य माणूस हैराण आहे. पेट्रोल, डिझेल,गॅसचे दर आकाशाला भिडले आहेत. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार राजरोसपणे सुरू असून नरेंद्र मोदी या गंभीर विषयावर आपले तोंड कधी उघडणार? असा सवाल किशोर तिवारी यांनी आपल्या पत्रात केला आहे.

कृषी क्षेत्र दुर्लक्षित

देशात 2014 मधील लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी दाभडी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भ शेतकरी आत्महत्यामुक्त करू, शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न हमीभाव, पत पुरवठा, लागवड खर्च कमी करणे, जमिनीची उत्पादकता वाढविणे, सिंचनाची व्यवस्था करणे, कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आणणे, पीक पद्धतीत बदल करणे ही प्रमुख आश्वासने दिली होती. 2019 मध्ये पांढरकवडा येथे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी महिला बचत गटांचे कर्जमाफ करून तीन लाखाचे व्याजमुक्त कर्ज देणे व सर्व आदीम आदिवासी बंजारा, भटक्या समाजाला पक्के घर देण्याचे, सर्वांना पिण्याचे शुद्ध पाणी नळाने घरी देऊ, प्रत्येक घरात एकाला रोजगार देऊ अशा घोषणा केल्या होत्या.

व्याजात वाढ

दहा वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. मायक्रो फायनान्स कंपन्यांनी व सहकारी पतसंस्थांनी 18 ते 24 टक्के व्याज वसुली करून सर्व महिला बचत गटाच्या माताभगिनींचे संसार रस्त्यावर आणले आहेत. सरकारी बँका झोपा काढत आहेत. केंद्र सरकारचे धोरण हे फक्त मोठ्या कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांना लाखो कोटी रुपयांचा फायदा पोहोचविणे हाच असल्याचा आरोप यावेळी शेतकरी नेते तिवारी यांनी केला.

अन्याय खेदजनक

उत्तर भारतात शेतकऱ्यांचे खूप मोठे जनआंदोलन सुरू आहे. त्यांच्या मागण्या ऐकुन घेण्याचे सौजन्यसुद्धा नरेंद्र मोदींना असू नये. त्यांना दिल्लीला पोहोचू न देता शेतकऱ्यांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून लाठीचार्ज करण्यात येत आहे. जनआंदोलन करण्यासाठी शेतकऱ्यांना सुप्रीम कोर्टात जावे लागत आहे. यापेक्षा मोठी शोकांतिका नसल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT