Shyam Manav chandrashekhar bawankule devendra fadnavis sarkarnama
विदर्भ

Shayam Manav News : श्याम मानवांच्या भाषणावेळी गोंधळ, भाजयुमोनं कार्यक्रम उधळून लावला

Rajesh Charpe

Nagpur News : विधानसभेची निवडणूक जाहीर होताच पुरोमागी संघटना सक्रिय झाल्या आहेत. महाविकास आघाडीने लोकसभेच्या निवडणुकीत संविधानाचा मुद्दा चांगलाच तापवला होता. याचा मोठा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला असल्याचे दिसून येते.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने पुन्हा एकदा संविधानाचा मुद्दा घेऊन श्याम मानव यांनी महायुतीच्या विरोधात प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे चिडलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या (BJP) कार्यकर्त्यांनी मानव यांच्या कार्यक्रमात चांगलाच गोंधळ घातला. त्यांच्या कार्यक्रमाचे पोस्टर, बॅनर फाडून कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला.

दोन महिन्यांपूर्वी श्याम मानव यांच्या वक्तव्याने मोठी खळबळ उडाली होती. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकला होता असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर आजी-माजी गृहमंत्र्यांमध्ये वादाला सुरुवात झाली होती. हा वाद चांगलाच गाजला होता.

देशमुखांनी आपल्याला फडणवीस यांनी एक माणूस पाठवला होता. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या विरोधात शपथपत्र लिहून देण्यास सांगितले होते असा आरोप केला. यास देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत काय बोलले याचा पेनड्राईव्ह आपल्याकडे असल्याचे सांगून त्यांना इशारा दिला होता.

याचवेळी श्याम मानव (Shayam Manav) यांनी सर्व पुरोगामी संघटनेच्यावतीने संविधान बचावाचे कार्यक्रम आपण घेणार असल्याचे जाहीर केले होते. बुधवारी (ता.16) रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात श्याम मानव यांचे ‘संविधान बचाव-महाराष्ट्र बचाव' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

हा कार्यक्रम उधळून लावण्यासाठी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेले फलक व बॅनर फाडले. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती.

या सर्व घटनाक्रमावर श्याम मानव म्हणाले, नागपूरमधूनच संविधान समाप्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे हे यातून दिसून येते. गोंधळ आणि विरोधाची आपल्याला सवय आहे. माझ्यासाठी ही नवीन बाब नाही.

कार्यक्रमांमध्ये गोंधळ घालणे हा फक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरची गदा नाही तर लोकशाहीवरचा हल्ला आहे. निवडणुकीची आचारसंहिता घोषित झाल्यानंतर हे लोक अशा पद्धतीने वागत आहे. त्यावरून संविधान धोक्यात असल्याचे दिसून येते असेही श्याम मानव म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT