Nawab Malik letter News : Sarkarnama
मुंबई

Nawab Malik letter News : 'मलिकांचं 'ते' पत्र फडणवीस-अजित पवारांनी ठरवून लिहिलंय'; माजी मंत्र्यांचा खळबळजनक आरोप!

Pradeep Pendhare

Mumbai News : "भाजपचे सत्तेसाठी काहीही, असे गणित आहे. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्याबाबत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलेले पत्र म्हणजे, हे ठरवून केलेला विरोध आहे", असा खळबळजनक आरोप काँग्रेस विधिमंडळाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला आहे, त्यामुळे या प्रकरणावरील आरोप - प्रत्यारोप आणखी वाढीस लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. (Latest Marathi News)

नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी अवकाळी आणि अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीवरून सरकारला प्रचंड धारेवर धरले आहे. शेतकऱ्यांना भरपाई मिळावी या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी विरोधकांनी सभागृहाबाहेर एकत्र येत सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

यासाठी विरोधकांनी गळ्यात कापसाचे हार आणि हातामध्ये धान घेऊन निदर्शने केली. यावेळी काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीची काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्यावरील देशद्रोहाच्या आरोपावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलेल्या पत्राबाबत प्रतिक्रिया दिली.

आमदार नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली होती. यानंतर नवाब मलिक हे काल नागपूर हिवाळी अधिवेशनात अजित पवार गटाबरोबर सभागृहात बसले. यावरून भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून देशद्रोहाचा आरोप असलेल्या नवाब मलिक यांना सत्तेत सहभागी करून घेऊ नये, अशी मागणी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे पत्र आता सार्वजनिक झाले आहे.

या पत्रावर काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर निशाणा साधला. "भाजप हे सत्तेसाठी काही करू शकते, हे जनतेने पाहिलेले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हे पत्र समजून-उमजून दिलेले आहे. रोज तर शेजारी शेजारी बसतात, आता पत्र देण्याचे कारण काय? नवाब मलिक यांच्याबाबत फोनवर देखील सांगता आले असते. पत्र देण्याचा काय प्रकार आहे. पत्र द्यायचे. त्यानंतर ते व्हायरल करायचे. हे सगळं ठरून आहे. हे जनतेला चांगलं माहित आहे. सत्तेसाठी काहीही हे भाजपचे घोषवाक्य आहे. हे सर्वजण एकत्र बसून काय काय ठरवतात हे आपल्याला माहित नाही. परंतु जे काय ठरवतात हे सर्वांना माहीत होते आणि दिसते आहे", असाही टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT