Rohit Pawar On Jitendra Awhad : Jitendra Awhad Controversial statement : Sarkarnama
मुंबई

Rohit Pawar On Jitendra Awhad : रोहित पवारांनी आव्हाडांना फटकारले; रामावरील वादग्रस्त विधानावर घरचा आहेर...

सरकारनांमा ब्यूरो

जुई जाधव -

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी त्यांच्याच पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनाच घरचा आहेर दिला आहे. आव्हाड यांनी प्रभू राम मांसाहारी होते, असे वाद निर्माण करणारे वक्तव्य केल्याने त्याचे पडसाद विरोधांकडूनच नव्हे, तर त्यांच्या पक्षांतही उमटू लागल्या आहेत. काल (दि. 3 जाने) शिर्डी येथील पक्षाच्या शिबिरात रामाच्या संदर्भात केलेल्या वक्ताव्याच्या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत, त्यांना चांगलेच सुनावले आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शिर्डी येथे दोन दिवसांचे शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात भाषण करत असताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भगवान श्रीरामांच्या संदर्भात एक वक्तव्य केलं आहे. भगवान श्रीराम हा बहुजनांचे दैवत आहेत, ते मटण खायचे, या आव्हाड यांच्या वक्तव्याचा समाचार आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत घेतला आहे.

रोहित पवारांचे काय आहे ट्विट?

"आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे."

"देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ, अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे," असं ट्विट करत रोहित पवारांनी त्यांचा समाचार घेतला.

काय होतं आव्हाडांचं विधान ?

"राम हा शाकाहारी नव्हता, तर मांसाहारी होता. त्याने 14 वर्ष वनवास भोगला होता. मग ते शाकाहारी कसे असू शकतात?”, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. “शिकार करून खाणारा राम आमचा आहे. आम्ही आज मटण खातो. राम बहुजनांचा आहे. आम्ही रामाच्या पावलावर चालतो. १४ वर्ष जंगलात काय खाणार?”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

आव्हाडांच्या या विधावरून आता राजकारण पेटलं आहे. सत्ताधाऱ्यांकडूनही त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. भाजपच्या आमदारांकडून उद्या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे. आव्हाड यावर कशा प्रकारे स्पष्टीकरण देतात? हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT