Mumbai, 23 February : देशाच्या राजधानीत भरलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विविध कारणांमुळे चर्चेत आहे. साहित्य संमेलनाच्या आधी महादजी शिंदे यांच्या नावाने दिलेल्या पुरस्कारावरून वादळ उठले होते, ते शमते ना शमते तोच साहित्य संमेलनात आयोजित करण्यात आलेल्या राजकीय परिसंवादामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. साहित्य संमेलनाच्या व्यासापीठावरून नीलम गोऱ्हे यांनी केलेले आरोप ठाकरेंच्या जिव्हारी लागले आहेत. ठाकरेंचे विश्वासू खासदार संजय राऊत यांनी थेट अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाला पत्र लिहून नाराजी व्यक्त करताना उषा तांबेंना मर्सिडीज गाडी भेट दिल्याचे गोऱ्हे यांनी म्हटल्याचा दावा केला आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रात म्हटले आहे की, ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत साजरे झाले, त्याबद्दल मराठी साहित्य महामंडळाचे अभिनंदन. दिल्लीतील साहित्य संमेलनात चर्चेत आलेले अनेक चर्चासत्र आणि परिसंवाद हे साहित्यबाह्य होते. एखाद्या राजकीय विचारसरणाच्या दबावाखाली संमेलन व त्यातील कार्यक्रमांचे आयोजन झाले. साहित्य महामंडळाच्या परंपरेस हे शोभणारे नाही.
या चर्चा परिसंवादात काही टिनपाट निमंत्रकांनी मराठी साहित्य संमेलनाच्या (Marathi Sahitya Sammelan) व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला. तसेच, आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले, त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे काय?
साहित्य संमेलनात रविवारी (ता. २३ फेब्रुवारी) असे घडलो आम्ही या परिसंवादात नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली. साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केले काय? व सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे काय? नसेल तर साहित्य महामंडळाने त्वरित माफी मागावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
शिवसेनेने पत्रात म्हटले आहे की, नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या मंचावरून बाहेर पडताच तालकटोरा मैदानाबाहेर पत्रकारांना सांगितले की, मी महामंडळाच्या सदस्यांना ५० लाख रुपये देऊन या कार्यक्रमा सहभागी झाले. महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना त्या अगोदर मर्सिडीज गाडी भेट देऊन या कार्यक्रमाचे आयोजन करायला लावले. हे खरे की खोटे माहित नाही. पण, महामंडळाच्या प्रतिष्ठेला त्यामुळे धक्का बसला आहे. साहित्य महामंडळ विकले गेले आहे, अशी चर्चा लोकांत होणे हे चित्र चिंताजनक आहे.
नीलम गोऱ्हे यांनी काय म्हटले होते?
नवी दिल्लीत येथील साहित्य संमेलनातील परिसंवादात बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. शिवाजी पार्कवरील २०१२ ते २०१४ पर्यंतच्या सगळ्या कार्यक्रमाची तयारी त्यांचेच (एकनाथ शिंदे) लोक करायचे. प्रत्येक सभेला ठाण्यातून लोकं यायची आणि तेच सगळी तयारी करायचे. पण मुळात संपर्कच नको असेल नेत्यांना तर तिथे आपण काय करू शकतो? यावर ‘नव्या मॅनेजरचा गल्ला गोळा करण्याचा प्रयत्न तेव्हापासून सुरू होता का?' असं विचारताच त्या म्हणाल्या ‘त्यांच्यावर ते ढकललं जात होतं. (ठाकरेंच्या शिवसेनेत) दोन मर्सिडीज दिल्या की पदं मिळायचं, नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो’, असं म्हणत नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.