MLC Election : ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार माजी आमदार रवींद्र फाटक आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पवार यांच्यात थेट लढत होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेचा विजय सोपा मानला जात आहे. मात्र, भाजप आणि बहुजन विकास आघाडीच्या भूमिकेमुळे शिंदे यांची धाकधूक वाढली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील नेत्यांनी या जागेवर दावा केला होता. एकनाथ शिंदेंनी (Eknath shinde) मात्र ही जागा शिवसेनेकडेच कायम ठेवण्यात यश मिळवले. पण तेव्हापासूनच भाजप नाराज असल्याची चर्चा आहे. याच नाराजीतून फाटक यांचा अर्ज भरतेवेळी रवींद्र चव्हाण यांच्यापासून भाजपचे आमदार आणि स्थानिक नेते अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीचा जायचा तो राजकीय मेसेज गेलाच. या नाराजीचा शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र फाटक आणि महायुतीतील (Mahayuti) नेत्यांनी टेंभीनाका येथील आनंदाश्रमात जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. त्यानंतर पदयात्रेद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. या वेळी खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार माधवी नाईक, कुमार आयलानी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव, नजीब मुल्ला उपस्थित होते.
मतांची गणिते ठरणार महत्त्वाची
विजयासाठी महायुतीकडे आवश्यक असणाऱ्या मतांचे गणित आहे. मात्र, तरीही भाजपच्या नाराजीने शिवसेनेच्या फाटक यांची धाकधूक वाढवली आहे. निर्णायक ७१ मते असलेल्या बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर (आप्पा) यांनी अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. त्याचवेळी काँग्रेसकडे ४७, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ३८, राष्ट्रवादी काँग्रेस २९ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे १८ मते आहेत. याशिवाय मनसे, समाजवादी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी तसेच अपक्ष सदस्यांची मतेही निकालावर प्रभाव टाकू शकतात.
सर्व 17 जागा महायुती जिंकणार : शिंदे
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे- पालघरसह राज्यातील सर्व १७ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा दावा केला. बंडखोरीबाबत विचारले असता, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ४ जूनपर्यंत असून, त्यापूर्वी सर्व संबंधितांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, असे शिंदे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.