Mumbai, 09 June : भारतीय जनता पक्षाने नकार दिल्याने समीर भुजबळ यांची मंत्रिपदाची संधी गेली, असे माध्यमांमध्ये सांगण्यात येत आहे. मात्र तसं काही नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सकारात्मकता दाखवली होती. कालावधी थोडा कमी आहे, त्यामुळे आपल्याला लगेच शपथविधी करता येणार नाही. पण, जेव्हा मंत्रिमंडळ फेरबदल होईल, त्या वेळी तुमचा शपथविधी करता येईल, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे समीर भुजबळ यांनी सांगितले. माझ्या मंत्रिपदाला भाजपचा विरोध नव्हता. तसेच, राष्ट्रवादीच्या नेतृत्वानेही छगन भुजबळांना राज्यसभेवर संधी, तर मला मंत्रिपदासाठी होकार दिला होता, हेही त्यांनी स्पष्ट केले.
छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, त्यांच्या मंत्रिमंडळातील जागेवर समीर भुजबळ (Sameer Bhujbal ) यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र त्यांची ती मागणी मान्य झाली नाही, त्यावर समीर भुजबळ यांनी बैठकीतील घडमोडींवर भाष्य केले.
ते म्हणाले, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना राज्यसभेवर जाण्याची इच्छा होती. तीन ते चार वेळा संधी आली होती आणि काही कारणामुळे हुकली होती. अनेक वर्षे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काम केल्यानंतर आता त्यांची केंद्रीय पातळीवर काम करण्याची इच्छा होती. त्यांनी अनेक वर्षे महाराष्ट्रात, तसेच समता परिषदेच्या निमित्ताने देशात वेगवेगळ्या ठिकाणी बैठका, मेळावे आणि आंदोलने केली आहेत. पण, आता दिल्लीच्या राजकारणात जाण्याची वेळ आलेली आहे, त्यामुळे त्यांनी पक्षाकडे राज्यसभेवर जाण्याबाबतची इच्छा व्यक्त केली होती.
छगन भुजबळ राज्यसभेवर गेले असते, तर येवल मतदारसंघात पोटनिवडणूक लागली असती, त्यामुळे मंत्रिपदाची शपथ घ्यायला काहीच हरकत नसावी, असं त्यांचं म्हणणं होतं. आता प्रश्न राहिला माझ्या मंत्रिपदाचा? तर छगन भुजबळ यांनी पहिलं शिवसेना, नंतर काँग्रेसमध्ये काम केले. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर ते शरद पवार यांच्यासोबत गेले हेाते, असेही समीर भुजबळ यांनी नमूद केले.
ते म्हणाले, शिवाजी पार्कवरील १९९९ मधील सभा यशस्वी करण्यात छगन भुजबळ यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत होता. शेवटच्या तीन ते चार दिवसांत तर आम्ही शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर झोपून काम केलं. तेव्हापासून मी पक्षाचं काम करतोय. पण बहुतांश वेळा मी बॅक स्टेजला होता. पण नाशिकच्या खासदारकीला तिकिट देऊन शरद पवार यांनी मला पहिल्यांदा संधी दिली. तेव्हासुद्धा मी मागितलं नव्हतं, पण कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी त्या ठिकाणी उभं राहिलो होतो. मी त्या खासदारपदाला न्याय दिला.
मी कायम कार्यकर्ता म्हणूनच काम केले, कधीही पदाची मागणी केली नाही. अजितदादांनी मला स्वतःहून सांगितलं की, मुंबईचं अध्यक्षपद घेऊन जरा शहरात पक्षाची बांधणी कर. त्यानंतर मी संघटनेचे काम केले, असेही समीर भुजबळ यांनी स्पष्ट केले.
मंत्रिपद हुकल्यामुळे मी नाराज नाही आणि नाराज होऊन काय होणार आहे. आपण राजकारणात लोकांसाठी असतो, त्यांची कामं करण्यासाठी असतो. येवल्यातील अनेक कामांसंदर्भात कालच मी शिवेंद्रसिंहराजेंची भेट घेतली. नाराज होऊन काही होत नसतं. आज ना उद्या संधी येत असते. आज नही तो कल, कल नही तो परसो, त्यामुळे नक्कीच कधीतरी होईल, असा विश्वास समीर भुजबळ यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.