Jayant Patil, Eknath Shinde, Devendra Fadanvis sarkarnama
नाशिक

Nashik Constituency 2024 : कांदा निर्यातीवरून जयंत पाटलांनी भाजपला फटकारले; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गुजरातसाठी काम करतात का?

Sampat Devgire

Jayant Patil news : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज भाजपला चांगलेच फटकारले. कांदा निर्यात बंदीच्या प्रश्नावर भाजप फसवणूक करीत आहे. त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मूर्ख समजू नये, या शब्दात पाटील यांनी भाजपची खरडपट्टी काढली.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध नेते उपस्थित होते. कार्यकर्ते, उपस्थितांमध्ये प्रचंड जोश होता. रणरणत्या उन्हात हजारो कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले. हे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात देशाने घोषणा देत होते.

यावेळी पाटील यांनी केंद्रातील भाजप सरकार शेतकरी व जनतेची फसवणूक करीत आहे. त्यांनी गुजरातमधील पांढरा कांदा निर्यात करण्याचा आदेश ऐन निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काढला आहे. मात्र महाराष्ट्रातील शेतकरी लाल कांदा निर्यातीला परवानगी मागत आहेत, त्याकडे साथ दुर्लक्ष केले आहे. हे सरकार गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला महत्त्व देते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कांद्याला निर्यातीची परवानगी का देत नाही?, असा प्रश्न त्यांनी केला.

ते म्हणाले, यासंदर्भात नुकताच केंद्र शासनाने ९९ हजार टन कांदा निर्यात करण्याचे आदेश काढले आहेत. मात्र हे आदेश फसवे आहेत. जुन्या काढलेल्या आदेशांचे एकत्रीकरण करून केंद्र शासनाने त्याचे पत्र काढले. दोन वाजून 48 मिनिटांनी हे पत्र निघाले. दोन वाजून 51 मिनिटांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र सरकार आणि भाजपचे अभिनंदन केले. हे सरकार शेतकऱ्यांना मूर्ख समजते का?. त्यांना गुजरातचा कांदा महत्त्वाचा वाटतो आणि महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी दुय्यम का वाटतात असा प्रश्न त्यांनी केला.

डिसेंबर महिन्यापासून विविध निर्णय घेऊन केंद्र शासनाने महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांची कोंडी केली आहे. प्रारंभी ४० टक्के निर्यात शुल्क लावण्यात आले. त्यानंतर पुढे थेट कांदा निर्यात बंदीच केली. गुजरातचा कांदा तुम्हाला महत्त्वाचा वाटतो. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील शेतकरी यांना दुय्यम वागणूक का दिली जाते. राज्यातील मुख्यमंत्री हे गुजरातसाठी काम करतात का असा प्रश्नही त्यांनी केला.

भाजपने निवडणूक आचारसंहिता सुरू असताना गुजरातच्या कांद्या निर्यातीचे आदेश काढले. हा आचारसंहितेचा भंग आहे. भाजपने महाराष्ट्र राज्य दुय्यम वागणूक दिली आहे. त्या विरोधात भाजपचा निषेध करण्यासाठी या निवडणुकीत पूर्ण ताकतीने महाविकास आघाडीच्या मागे उभे रहा. शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी नाशिक आणि दिंडोरी मध्ये भाजपला पराभूत करा असे आवाहन त्यांनी केले.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT