Congress Leader Rahul Gandhi  Sarkarnama
नाशिक

Rahul Gandhi News : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात होणार 'सुपरफास्ट'

Sampat Devgire

Congress Politics News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रा येत्या १२ मार्चला महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा अधिक गतिमान करण्यात आली आहे. गांधी यांचा या यात्रेत वाहनांच्या प्रवासावर भर असेल.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रा 12 मार्चला गुजरातमधून नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करेल. या वेळी त्यांचे नंदुरबार नवापूर (Navapur) या आदिवासी भागात मोठ्या उत्साहात स्वागत करण्याची तयारी पक्षाने केली आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबारमध्ये गेली दोन टर्म भाजपचा खासदार आहे.

आदिवासी विकासमंत्री व भाजप नेते डॉ. विजयकुमार गावित (Vijakumar Gavit) यांना आव्हान देण्यासाठी या यात्रेच्या माध्यमातून गावित विरोधक आणि महाविकास आघाडीचे पक्ष त्यासाठी नियोजन करीत आहेत. राहुल गांधी १२ मार्चला नंदुरबार येथे मुक्काम करण्याची शक्यता आहे.

१३ मार्चला मालेगाव (Malegaon) शहरात त्यांचा रोड शो होणार आहे. हा रोड शो झाल्यानंतर सायंकाळी मालेगाव येथेच सैंदाणे बाजार समितीच्या आवारात सायंकाळचा कार्यक्रम झाल्यावर ते मुंबई आग्रा महामार्गालगत मुक्काम करतील.

राहुल गांधी यांच्या उपस्थितीत 14 मार्चला चांदवड येथील बाजार समिती (Bazar Samiti) सकाळी जाहीर सभा होणार आहे. या वेळी गांधी कांदा निर्यातबंदीमुळे निर्यात झालेल्या प्रश्नांबाबत आवाज उठवतील. केंद्र शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या भूमिकेबाबत हा त्यांचा कार्यक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांच्या मतदारसंघात हा कार्यक्रम असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. या वेळी ते निवडक कांदा द्राक्ष आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधतील.

राहुल गांधी (Rahul Gandhi) आपल्या दौऱ्यात नाशिकला 'रोड शो' करणार आहेत. वेळेचे नियोजन करण्यासाठी त्यांची एक टीम कार्यरत आहे. याबाबत आज दुपारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नाशिक येथे होणार आहे.

नाशिकच्या दौऱ्यात (Nashik Tour) गांधी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतील. शहरातील कार्यक्रमानंतर ते त्र्यंबक मार्गे जवाहरला जातील. त्यानंतर दोन दिवस ठाणे जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर मुंबईत या यात्रेचा समारोप होईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra) दुसऱ्या टप्प्यातील यात्रेत रोज १६ किलोमीटर पायी प्रवास करणार होते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमामुळे या यात्रेच्या नियोजनातदेखील बदल झाले आहेत.

मध्यंतरी ही यात्रा काही काळ स्थगित करून ते दिल्लीतील बैठकांनादेखील उपस्थित राहिले होते. त्यानंतरच्या यात्रेत त्यांची यात्रा वाहनांद्वारे सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ही यात्रा सुपरफास्ट झाल्याचे चित्र आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT