Ramdas Athawale, Devendra Fadanvis
Ramdas Athawale, Devendra Fadanvis sarkarnama
पिंपरी चिंचवड

Loksabha election 2024 : आठवलेंचेही शिवतारे झाले; एकही जागा न मिळता नाराजी दूर

Uttam Kute

Pimpari News : निवडणूक कुठलीही असो त्यात बंड होतेच. ते थंड करताना संबंधितांच्या नाकीनऊ येते. लोकसभेसारख्या या वेळी प्रतिष्ठा पणास लागलेल्या मोठ्या निवडणुकीत, तर त्यासाठी भाजपला सध्या मोठी कसरत करावी लागते आहे. युतीतील शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी बारामतीत उभारलेले बंडाचे निशाण भाजपचे राज्यातील सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच थंड केले. त्यानंतर त्यांनी आरपीआय या दुसऱ्या घटक पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे असेच बंड आज (ता.३०) शांत केले.

मागील विधानसभेला पुरंदरमध्ये अजित पवार यांनी सांगून शिवतारेंचा पराभव केला होता. दरम्यान, अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा या या वेळी लोकसभेला बारामतीच्या उमेदवार असणार आहेत. त्यांचा पराभव करून विधानसभेतील पराभवाचे उट्टे लोकसभेला काढण्याचे विजय शिवतारेंनी ठरवले होते. त्यासाठी ते अपक्ष म्हणून बारामतीच्या मैदानात उतरणार होते.

त्यांचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांची भेट घेतल्यानंतरही त्यांचा हा पवित्रा कायम होता. मात्र, फडणवीसांनी त्यांना भेटून समजूत काढल्यानंतर त्यांनी आपली तलवार परवा म्यान केली. तसेच आता आठवलेंच्या बाबतीतही असेच आज घडले. आठवलेंनी स्वत: ला शिर्डीसह सोलापूर अशा दोन जागांची मागणी भाजपकडे केली होती. पण, एकही न मिळाल्याने पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड संतप्त झाले होते.

त्याची दखल घेत आठवलेंनी २८ मार्चला पुण्यात राज्यस्तरीय बैठक बोलावली. ती वादळी होणार अशी बातमी एक दिवस अगोदर (ता.२७) 'सरकारनामा'ने दिली होती. ती खरी ठरली. कारण या बैठकीत युतीला आमची गरज नसेल, तर सोबत राहायचं की नाही, याचा निर्णय घेऊ, असा इशारा देत आठवलेंनी बंडाचे निशाण फडकावले. मात्र, शिवतारेंप्रमाणे त्यांचेही हे बंड दोन दिवसांत थंड झाले. त्यामुळे त्यांचाही विजय शिवतारे झाल्याची चर्चा रंगली.

रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने फडणवीसांची आज मुंबईत भेट घेतली. त्यानंतर जागावाटपातील पक्षाची नाराजी दूर झाल्याचे सांगत देशात पुन्हा मोदी सरकार आणण्यासाठी महायुतीचा प्रचार करणार असल्याचे आठवलेंनी सांगितले. पक्षाला योग्य वाटा आणि सन्मान दिला नसल्याची नाराजी या भेटीत पुन्हा व्यक्त करण्यात आली. त्यावर पुन्हा असे होणार नाही, असे सांगत सन्मानाने सोबत ठेवणार असल्याचे आश्वासन फडणवीसांनी दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे मागचे विसरून नव्या दमाने महायुतीच्या प्रचाराला लागणार असल्याची घोषणा आठवलेंनी केली. केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद, राज्यात एक मंत्रिपद, एक विधान परिषद सदस्य, विधानसभा निवडणुकीत किमान 10 जागा, राज्य मंत्री दर्जाच्या दोन महामंडळाची अध्यक्षपदं, उपाध्यक्षपद, 50 महामंडळ सदस्य संचालक पदे, जिल्हा नियोजन समिती सदस्य पदे देण्याच्या मागणीचे निवेदन या भेटीत आरपीआयच्या शिष्टमंडळाने फडणवीसांना दिले. त्यावर झालेल्या त्या सर्वांची पूर्तता करण्याचे आश्वासन फडणवीसांनी दिल्याची माहिती आठवलेंनी दिली. पण, ती पूर्ण होणार का हे येत्या काही महिन्यांतच स्पष्ट होणार आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT