Collector Suhas Diwase Sarkarnama
प्रशासन

Ujani Dam News : उजनीच्या अपघातानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला 'हा' मोठा निर्णय !

Chaitanya Machale

Pune News : धरणांच्या जलाशयातून बोटीने प्रवास करताना होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आता नियमावली तयार करण्याचा विचार जिल्हा प्रशासनाने सुरु केला आहे. त्याबाबतची पावले उचलली जात असून पुढील काही दिवसांमध्ये ही नियमावली तयार करून तिची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न असणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील इंदापूर जवळ असलेल्या उजनी धरणाच्या बॅक वॉटर मध्ये एक प्रवासी बोट उलटली. त्यामध्ये या बोटीमधून प्रवास करणाऱ्या सहा जणांचा मृत्यू झाला. तर बोट उलटल्यानंतर बोटीतून प्रवास करत असलेल्या पोलिस निरिक्षकाला पोहता येत असल्याने ते पोहत किनाऱ्यापर्यंत आल्याने ते वाचले. यापूर्वी देखील धरणांच्या जलाशयातून प्रवास करताना बोट बुडून झालेल्या अपघातामध्ये काही नागरिकांना आपले जीव गमवावा लागल्याच्या घचना घडल्या होत्या. उजनी धरणाच्या जलाशयात बोट बुडून झालेल्या दुर्घटनेत काही डॉक्टरांना जीव गमावावा लागला होते. हे डॉक्टर फिरण्यासाठी येथे आले होते. सेल्फी काढत असताना हा अपघात घडला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पार्श्वभूमीवर धरणांच्या जलाशयातून बोटीने प्रवास करणाऱ्या बोटींबाबत नियमावली तयार करण्याचा विचार जिल्हा प्रशासनाने सुरू केला आहे. ही नियमावली तयार केल्यानंतर प्रत्येक बोट आणि बोटमालक, चालक यांची संपूर्ण माहिती त्या भागातील तहसीलदार आणि पोलिस प्रशासनाकडे उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे भविष्यकाळात अशा प्रकारचे होणारे अपघात टाळण्यासाठी मोठी मदत होईल, असे जिल्हाधिकारी (Collector) डॉ. सुहास दिवसे यांनी सांगितले.

पुणे (Pune) जिल्ह्यातील उजनी धरणांसह इतर धरणांच्या जलशयात मासेमारी करण्यासाठी बोटींचा वापर केला जातो. त्यासाठीची परवानगी जलसंपदा विभागाच्या वतीने दिली जाते. अनेक गावांमध्ये ये-जा करण्यासाठी रस्त्याने मोठा कालावधी लागतो. मात्र बोटीतून गेल्यास हे अंतर कमी होते. त्यामुळे मासेमारी करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या बोटींचा वापर प्रवासी वाहतूक करण्यासाठी होत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिने आवश्यक त्या सोयी- सुविधा उपलब्ध नसल्याने अपघात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे याबाबत आता कठोर पावले उचलण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. यासाठी धरण क्षेत्र असलेल्या भागातील तहसीलदारांकडून अहवाल मागविण्यात येणार आहेत.

उजनी धरणाच्या जलाशयातील बोटींबाबत देखील नियमावली तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कडक नियमावली तयार करून तिची अंमलबजावणी कठोरपणे केली जाणार आहे. यामध्ये संबधित बोट, बोटमालक, बोटचालक यांची नोंदणी केली जाणार आहे. पक्षीनिरिक्षण, पर्यटन, मासेमारी, प्रवास यापैकी नक्की कोणत्या कारणासाठी बोटींचा वापर केला जाणार आहे, याची माहिती घेऊन त्या पद्धतीने बोटी आणि बोटधारकांची नोंदणी होणार आहे. या बोटीमध्ये जीव वाचविण्यासाठी जॅकेट, (लाइफ जॅकेट), बोटींच्या आकारानुसार किती जणांना त्यातून प्रवास करता येईल, त्याची रचना कशी ठेवावी, अशी संपूर्ण माहितीची ही नियमावली असणार आहे.

धरणांच्या जलशयात बोटी चालविताना कोणती काळजी घ्यावी, संकट आल्यानंतर काय उपाययोजना करावी, याचे प्रशिक्षण संबधित बोटमालक, बोटचालकांना देण्याचा विचार केला जात आहे. यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) मदत घेऊन प्रशिक्षण दिले जाणर आहे. ही नियमावली तयार झाल्यानंतर त्याची कठोरपणे अंमलबजावणी होणार आहे. धरण क्षेत्र परिसरात ही नियमावली लागू राहणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचे अपघात टाळता येतील आणि त्यातून होणारी प्राणहानीदेखील टाळता येऊ शकतील, असा विश्वासही जिल्हाप्रशासनाने व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT