Mahesh Landge Sarkarnama
पुणे

Assembly Winter Session : भुजबळ, वडेट्टीवार, जरांगेंनी महाराष्ट्र एकसंध ठेवावा; आमदार लांडगेंची कळकळीची विनंती

Uttam Kute

Pimpri : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात गेल्या चार दिवसांपासून मराठा आरक्षणावर चर्चा सुरू आहे. भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी शुक्रवारी (ता. १५ डिसेंबर) पोटतिडकीने आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी ओबीसींचे आरक्षण काढून मराठ्यांना देण्यात येणार आहे, असा संभ्रम निर्माण करणारी टीम राज्यात काम करीत असून तिच्यापासून सावध राहण्याचे आवाहन केले. (Bhujbal, Wadettiwar, Jarange should keep Maharashtra united : MLA Landge's request)

संशयाचे बीज पेरणारी ही टीम तथा प्रवृत्ती खूप वाईट असल्याचा घणाघात लांडगेंनी केला. या असूर प्रवृत्तीनेच मराठा आणि ओबीसी समाजात चुकीचे मेसेज दिले. दोन्ही समाजात भांडणे लावली. ही विष पेरणारी अदृश्य शक्ती कोण, हे आता कळाले आहे, असे ते म्हणाले. मराठा आरक्षणावर सभागृहात बोलताना ज्यांनी शहाणपणा दाखवला, तो आपल्या मतदारसंघात त्यांनी दाखवला, तर वादच झाले नसते आणि होणारही नाहीत, असा सल्लाही त्यांनी दिला. पन्नास-साठ वर्षे सत्तेत असलेल्यांनी मराठा आरक्षणासाठी काय केले, असा जाबही त्यांनी विचारला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रत्येक गोष्टींमध्ये स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्या नेत्यांचे आमदार महेश लांडगेंनी आपल्या भाषणात कान टोचले. तसेच, मराठा आरक्षणात राजकारण करू नये, असा घरचा आहेर दिला. आरक्षणाच्या मुद्यावरून आक्रमक वक्तव्ये करून राज्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना महाराष्ट्र एकसंध ठेवण्याची कळकळीची विनंती त्यांनी केली.

कुणी कुणाचे आरक्षण घेणार नाही, असे सांगत दोन्ही समाजाला एकत्र रहायचंय, पण आग लावणाऱ्या नेतेमंडळींना एकत्र रहायचंय का, असा सवाल त्यांनी केला. सरकारी नोकरीच मिळत नसल्याने मराठा समाजाला नोकरीत आरक्षण पाहिजेच, असे लांडगे यांनी ठासून सांगितले. एमई (मास्टर ऑफ इंजिनिअरिंग) झालेला मराठा तरुण शिपायाच्या नोकरीसाठी उभा राहतो, ही विदारक स्थिती असल्याने शिक्षणातही आरक्षण गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

अनुकंपा तत्वावर नोकरी देणे यापूर्वीच्या आघाडी सरकारने थांबविल्याने क्लास थ्री आणि फोर मराठा कर्मचाऱ्यांची अवस्था आणखी दयनीय झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. आरक्षणामुळे शिक्षणच घेता न आल्याने सरकारी प्रकल्पांसाठी सर्वाधिक जमिनी देणाऱ्या मराठा समाजातील तरुणांना तेथील उद्योगाबाहेर टपरी लावावी लागते वा तेथे सिक्यूरिटी गार्ड म्हणून काम करावे लागत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT