Aaditya Thackeray Sarkarnama
पुणे

Aaditya Thackeray News : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार येणे का गरजेचे?; आदित्य ठाकरेंनी सांगितले कारण....

Uttam Kute

Pimpri News : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील मावळ, चिंचवड आणि पिंपरी या घाटावरील तीन विधानसभा मतदारसंघाचा आज (ता.२१ जानेवारी) दौरा केला. त्यात त्यांच्या तळेगाव दाभाडे आणि पिंपरी येथे सभा झाल्या. त्यानंतर पिंपरीत माध्यमाशी बोलताना त्यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार येणे गरजेचे का आहे, यामागील कारण सांगितले. (MahaVikas Aghadi government should come in Maharashtra : Aditya Thackeray)

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाच्या उमेदवारीवर ठोस भाष्य करणे आदित्य ठाकरे यांनी या वेळी कटाक्षाने टाळले. तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतरांचा विषय असल्याचे सांगत त्यावर विचारू नका, असे हसतहसत म्हणत आदित्य यांनी त्या प्रश्नाला बगल दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मावळच नाही, तर राज्यातील प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा महत्वाची आहे. कारण, गेली दोन वर्षांत महाराष्ट्र खूप अन्याय सहन करतो आहे. राज्यातील प्रत्येक उद्योग आणि रोजगार पलिकडल्या राज्यात पाठवला जात आहे. आमच्या हक्काचे आणि हिश्याचेही तिकडे पाठवले जात आहे, त्याचे दुःख आहे. राज्यात प्रत्येक क्षेत्र कोलमडले आहे. कारण मुख्यमंत्री अकार्यक्षम आहेत; म्हणून दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी राज्यात महाविकास आघाडी जिंकणे खूप महत्वाचे आहे, असे आदित्य म्हणाले.

स्वतःचे खाते माहिती नाही, त्यांच्यावर काय बोलणार?

आघाडीच्या काळात सह्या झालेले उद्योगपती गायब झाले, या उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या आरोपाचा समाचार घेताना आदित्य ठाकरे यांनी प्रथम तुम्ही कोणत्या सामंताबद्दल विचारता आहात, नाही, तर गडबड होते, अशी उपरोधिक विचारणा त्यांनी केली. कारण आमच्या आणि त्यांच्या (भाजप) नार्वेकरांमध्ये गडबड होते, असेही ते म्हणाले. त्यानंतर ज्यांना स्वतःच्या खात्याबद्दल काहीच माहिती नाही, वेदांता गेले हे त्यांना माहित नव्हतं. ज्यांना आपले खाते अद्याप ओळखता आले नाही, त्यांच्यावर काय बोलणार, असा टोला त्यांनी उद्योग मंत्री सामंतांना लगावला.

भाजपला विसर पडला, तेव्हा आम्ही अयोध्येला गेलो होतो

अयोध्येत उद्या श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. त्यादिवशी आम्ही नाशिक येथील काळाराम मंदिरात जाणार आहोत, त्यानंतर अयोध्येलाही जाणार आहे, असे आदित्य यांनी या वेळी स्पष्ट केले. तसेच, भाजपला विसर पडला होता, तेव्हा म्हणजे २०१८ आणि २०१९ ला अयोध्येला गेलो होतो, याची आठवणही त्यांनी करून दिली.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT