Mumbai APMC sarkarnama
पुणे

Mumbai APMC News : मुंबई बाजार समिती गैरव्यवहार; दोषींवर फौजदारी कारवाई होणार

गणेश कोरे

Pune News : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील चटईक्षेत्र (एफएसआय) प्रकरणी बाजार समिती व गाळाधारकांत झालेल्या लीज डीडमधील खंड २५ प्रमाणे फरकाची रक्कम वसूल करावी, दोषींवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश सहकार व पणन विभागाने पणन संचालक व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना दिले आहेत. या आदेशामुळे बाजार समिती संचालकांचे धाबे दणाणले आहेत.

तत्कालीन पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी लेखापरीक्षण अहवालातील गैरव्यवहारावरून बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त करून, फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश तत्कालीन जिल्हा उपनिबंधक दिलीप उढाण यांना दिले होते. यानंतर झालेल्या न्यायालयीन कारवाईमध्ये न्यायालयाने सदर प्रकरण खारीज केल्याने कारवाईचे आदेश दिल्याचे पणन विभागाचे कक्ष अधिकारी शैलेश सुर्वे यांनी पत्रात म्हटले आहे. सुर्वे यांनी संबधितांवर वसुली आणि फौजदारी करण्याचे आदेश पणन संचालकांना दिले आहेत.

मुंबई बाजार समितीमधील पाच हजार चौरस मीटरचा "एफएसआय" केवळ ६०० रुपये दराने विकुन बाजार समितीचे १२६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका लेखापरिक्षण अहवालात ठेवला आहे. या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, "एफएसआय"मधील फरकाची रक्कम वसूल करावी, यासाठी बाजार समितीच्या एका संचालकाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

त्यावर इतर संचालकांनी हरकत याचिका दाखल केले होती. या न्यायालयीन प्रकरणात १३ मार्च २०२४ रोजी न्यायालयाने वादी व प्रतिवादींचे युक्तिवाद एकूण घेऊन १९ मार्च २०२४ रोजी न्यायनिर्णय पारित केलेला आहे. न्यायालयाच्या निकालानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश सहकार व पणन विभागाचे कक्ष अधिकारी सुर्वे यांनी पणन संचालक आणि मुंबई बाजार समितीच्या सचिवांना दिले आहेत.

सुर्वे यांनी पत्रात म्हटले आहे की, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती व गाळाधारक यांच्यात झालेल्या लीज डीडमधील खंड २५ प्रमाणे फरकाची रक्कम वसूल करावी. वसुलीस नकार देणाऱ्या गाळाधारकांचे गाळे वाटपाचे आदेश रद्द करून वसुलीबाबत जिल्हा न्यायालय, ठाणे येथे याचिका दाखल करावी. प्रकरणी दोषी व्यक्तीविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार महेश शिंदेंनी उठवला होता आवाज

या प्रकरणी कोरेगावचे आमदार महेश शिंदे Mahesh Shinde यांनी विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडत "एफएसआय" वाटपात बाजार समितीचे अधिकारी व संचालक मंडळ दोषी असल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ४६६ गाळेधारकांना "एफएसआय"चे वाटप केलेले आहे. या गाळेधारकांकडून फरकाची रक्कम वसूल करण्याची कार्यवाही करण्याची ग्वाही दिली होती. तसेच या प्रकरणी न्यायालयात शपथपत्र दाखल करून न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असेही आश्वासन दिले होते.

सत्यमेव जयते - डॉ. सुभाष माने

एफएसआय प्रकरणी धडक कारवाई करणारे तत्कालीन पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया ॲग्रोवनसोबत बोलताना दिली. सत्य परेशान होता है....लेकीन पराभूत नही..असेही ते म्हणाले. या प्रकरणात मला प्रचंड त्रास देण्यात आला असल्याचेही माने म्हणाले.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT