Pune NCP Alliance: महापालिका निवडणुकांसाठी युत्या-आघाड्यांचा खेळ चांगलाच रंगला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून आपली वेगळी वाट काढणाऱ्या अजित पवारांच्या गटासोबत शरद पवारांच्या गटानं आघाडी केली आहे. पक्ष फुटल्यानंतरही स्थानिक निवडणुकीसाठी ते पुन्हा एकत्र आले आहेत, ते ही दोन स्वतंत्र पक्षांची युती म्हणून. पण पवार कुटुंब निवडणुकीच्या आखाड्यात एकत्र येण्यामागं नेमकं कारण काय? याची कारणमिमांसा करुयात.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांसोबत राहिलेल्या आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या गटावर कायमच टीका केली आहे. पण आज त्याच रोहित पवारांनी पुणे महापालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाल्याची घोषणा केली. यासाठी त्यांनी ही तर कार्यकर्त्यांची इच्छा! असंही सांगितलं. तत्पूर्वी अजित पवारांनी रविवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी युती करुन लढणार असल्याची घोषणा केली होती.
रोहित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरप्रमुख प्रशांत जगताप यांनी पक्ष सोडल्यानंतर अनेक कार्यकर्ते पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्याकडं आले आणि त्यांना सांगितलं की दोन्ही गटांनी या निवडणुकीत एकत्र यायला हवं. त्यामुळं स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखत दोन्ही राष्ट्रवादींनी पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
ही युती दोन्ही गटांमधील निवडणूक लढत सोपी व्हावी यासाठी करण्यात आली आहे. त्यामुळं हे दोन्ही पक्ष आता पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकत्र लढतील. रोहित पवार यांनी पुढे असंही म्हटलं की, या निर्णयामध्ये शरद पवार सहभागी नव्हते. पण त्यांचं म्हणणं आहे की, पक्षाचे कार्यकर्ते महत्वाचे आहेत तसंच महापालिका निवडणुकीसाठी त्यांचं म्हणणं महत्वाचं आहे. तसंच दोन्ही गटांमध्ये जागा वाटपांचा फॉर्म्युला देखील निश्चित करण्यात आला आहे.
महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र आपापल्या चिन्हांवर अर्थात 'घड्याळ' आणि 'तुतारी वाजवणारा माणूस' लढणार आहेत. दोन्ही वेगळ्या चिन्हांवर निवडणूक होणार असली तरी युती म्हणून लढणार असल्यानं आपल्या बालेकिल्ल्यात भाजपविरोधात मजबुतीनं लढतील. त्याचबरोबर दोन्ही पक्षांना याची खात्री आहे की, एकत्र येण्यामुळं स्थानिक नेत्यांचा भाजपत जाण्याचा प्रकार थांबेल. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही पक्षांमध्ये ही मोठी समस्या निर्माण झाली होती.
दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आशा आहे की, भविष्यात दोन्ही गट एकमेकांमध्ये विसर्जित होऊन जातील, यासाठीचं हे पहिलं पाऊल ठरू शकतं. पण आमदार रोहित पवार यांनी पक्षांच्या विलिनिकरणाच्या चर्चांना धुडकावून लावलं आहे. त्यांनी सोमवारी बोलताना हे स्पष्ट केलं की, दोन्ही गट केवळ दोन महापालिकांसाठीच एकत्र आले आहेत, ते ही स्थानिक कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार ते एकत्र आले आहेत. पण या दोन निवडणुकांमध्ये जर यांच्या युतीची कामगिरी चांगली राहिली तर जानेवारीत होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही दोन्ही राष्ट्रवादीची युती होऊ शकते.
राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष किंवा गट यांच्या एकत्रिकरणामध्ये अनेक अडथळे आहेत. सर्वात पहिलं म्हणजे दोन्ही पक्षांच्या ताकदीत फरक आहे. हे दोन्ही गट तेव्हाच एक होऊ शकतात जेव्हा अजित पवारांना पक्षाचा नेता मानलं जाऊ शकतं. केवळ अजित पवारांकडं पक्ष सोपवण्यावरुन मतभेद असल्यानेच पक्षामध्ये फूट पडली होती.
तसंच या फुटीनंतर झालेल्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांकडून पहिल्या फळीतले जवळपास सर्वच नेते तसंच ४० आमदार आणि शेकडो कार्यकर्ते अजित पवारांकडं गेले असताना देखील शरद पवारांच्या पक्षानं घवघवीत यश मिळवलं होतं. १० पैकी ८ खासदार पक्षानं निवडून आणले होते. तर अजित पवारांचा पक्ष ५ जागांपैकी केवळ एकच खासदार निवडून आणू शकला होता. त्यामुळं शरद पवारांच्या बाजुनं नेते कार्यकर्ते भक्कमपणे उभे असल्याचं सिद्ध झालं होतं. पण नंतर विधानसभेत पक्षाला मोठा फटका बसला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.