Daund, 10 January : येत्या पंधरा तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे मुंबईत येत आहेत. महायुतीच्या 237 आमदारांची बैठक त्यांनी बोलावली आहे. त्यात ते आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. पहिल्यांदाच ते एखाद्या राज्यातील आमदारांशी थेट संवाद साधत आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
दौंड तालुक्यातील दौंड विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या कार्यक्रमात अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते. ते म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकार सुदैवाने एका विचाराचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात भांडत आहेात. त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणाऱ्या वकिलाला दिल्लीत जाऊन भेटलो आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही त्यात लक्ष आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर लावाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री म्हणाले, महायुतीच्या जिल्हा स्तरावरील स्थानिक नेत्यांनी कोणाशी युती करायची, हे ठरवायचे आहे. काहींनी स्वतंत्र लढायचं असेल त्यांना तशी मुभा देण्यात येणार आहे. वेगवेगळे लढले आणि समारेच्यांचा फायदा होणार असेल तर तेथील नेत्यांनी युती करण्याचा निर्णय घ्यावा, असे स्वतंत्र महायुतीमधील जिल्हास्तरीय नेत्यांना दिले आहे.
अजित पवार म्हणाले, विकासकामांत कोणीही आडकाठी आणू नका. अधिकारीही चांगले आणले आहेत. डुडी नावाचे जिल्हाधिकारी आणले आहेत. त्यांना सांगितलं आहे की, माझ्या पुणे जिल्ह्यातील आरोग्य केंद्र नंबर एकची झाली पाहिजेत. गरिबांना चांगली ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा इतक्या चांगल्या करायचा निर्णय घेतला आहे, तुम्हालाही वाटेल की हे खरंच आहे की हे जे बोलतात, त्याप्रमाणे करतात.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून गजानन पाटील यांना आणले आहे. त्यांनाही सांगितलं आहे की, भेदभाव करायचा नाही. गावाला दिलेल्या पैशातून दर्जेदार काम झालं पाहिजे, असेही अजितदादांनी नमूद केले.
अजित पवार म्हणाले, पुण्याच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांची बढती होणार आहे. आता पुण्यालाही एसपीही चांगला आणतो. एकदम कडक एसपी आणतो. अजिबात दारुधंदेही चालू द्यायचे नाहीत. तुम्हाला सगळं काही दिलं जाईल. पण पोलिसांचा आदरयुक्त दबदबा असला पाहिजे. आयाबहिणी आणि मुलींबाबत वेडेवाकडं होता कामा नये. एखाद्याने चूक केली तर त्या नराधमाला अशी शिक्षा झाली पाहिजे, त्याला सात जन्म आठवले पाहिजेत.
पोलिसांच्या कामात मी अजिबात हस्तक्षेप होऊ देणार नाही. यावर मी चंद्रकांतदादा पाटील, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशीही बोललो आहे. बीडच्या प्रकरणातही कोणाचेही लाड होऊ देणार नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.